India V New Zealand, T20 World Cup 2026 Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाचा सामना रंगणार आहे. भारत-न्यूझीलंड दोन्ही संघाना या सामन्यातील विजयासह जेतेपद उंचावून इतिहास रचण्याची संधी आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या प्रयत्नात तिसरी ट्रॉफी जिंकण्यासाठी जोर लावताना दिसेल. दुसरीकडे टीम इंडियासमोर तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकत आतापर्यंत जे कुणाला जमलं नाही तो डाव साधण्याची संधी आहे. पण यासाठी टीम इंडियाला तीनचा तिढा सोडवण्याचे आव्हान असेल. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडविरुद्धचा धक्कादायक आकडा; 'त्या' तीन चुका टाळा अन् ...
भारत-न्यूझीलंड यांच्यात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. या तिन्ही सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली आहे. यंदाच्या हंगामात ऐतिहासिक जेतेपद मिळवायचे असेल तर टीम इंडियाला टी २० वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या खराब कामगिरीचा इतिहास बदलावा लागेल. त्यासाठी टीम इंडियाला या आधी झालेल्या तीन चुका टाळाव्या लागतील.
"सगळे एकच ओळ..." सूर्या दादानं न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरला दिला कडक रिप्लाय; तो नेमकं काय म्हणाला?
फलंदाजी क्रमवारीतील बदल
यंदाच्या हंगामात अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. फायनल सामन्याआधी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढा, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पण हा बदल टीम इंडियासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. २०२१ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयत्या वेळी टीम इंडियाने रोहित शर्माच्या जागी ईशान किशनला सलामीला धाडण्याचा प्रयोग केला होता. तो चांगलाच फसला. मोक्याच्या क्षणी बदलाच्या प्रयोगामुळे टीम इंडियाच्या आत्मविश्वासावर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर जोडीला आपल्या गेम प्लॅनवर कायम राहूनच मैदानात उतरावे लागेल.
फिरकीचं कोडं
भारतीय संघातील फलंदाज हे कोणत्याही फिरकीपटूचा सामना करण्यात सक्षम असल्याचा इतिहास आहे. पण याच संघाविरुद्ध न्यूझीलंडच्या संघाने फिरकीची जादू दाखवून दिली आहे. २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मिचेल सँटनर आणि इश सोधी यांनी नागपूरच्या घरच्या मैदानात टीम इंडियासमोर अडचणी वाढवल्या होत्या. यंदाच्या हंगामातही भारताचे आघाडीचे फलंदाज फिरकीसमोर अडखळताना दिसले आहेत. हे कोडं सोडवल्याशिवाय विश्व विक्रमी जेतेपदाचा मार्ग सुकर होणार नाही.
अति आत्मविश्वास नको!
भारतीय संघ सुरुवातीपासूनच यंदाच्या स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानला जात आहे. २०२३ मध्ये घरच्या मैदानात झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघाचा तोरा अगदी असाच होता. पण सातत्याने विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला त्यावेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळीही मैदान तेच आहे. त्यामुळे अति आत्मविश्वासापेक्षा प्रतिस्पर्धी संघातील डाव हाणून पाडण्याचा मंत्र जपणं गरजेचे आहे. १९ नोव्हेंबर २०२३ मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने ICC स्पर्धेत सलग १७ विजय नोंदवले. पण याच मैदानात येऊन पुन्हा टीम इंडियाची गाडी अडखळली. सुपर ८ स्पर्धेतील लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाचा विजय रथ रोखला होता. तो अनर्थ पुन्हा घडणार नाही, याची टीम इंडियाला खबरदारी घ्यावी लागेल.