Why Shreyas Iyer Not Be Selected In India Squad For England Series : इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. पण शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या १८ सदस्यीय संघातून श्रेयस अय्यरचा पत्ता कट झाला. टीम इंडियातून वगळल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमक दाखवल्यावर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून त्याने वनडे संघात दमदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळाले होते.. इंग्लंड दौऱ्यातून तो कसोटीत कमबॅक करेल, असे वाटत होते. पण निवड समितीने त्याच्यावर भरवसा दाखवलेला नाही. अजित आगरकर यांनी तो चांगला खेळतोय, हे मान्य करताना सध्याच्या संघात त्याची जागा होत नाही असे म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अय्यरसंदर्भात काय म्हणाले अजित आगरकर?
श्रेयस अय्यरला संघात स्थान का नाही? यासंदर्भातील प्रश्नावर अजित आगरकर म्हणाले आहेत की, "वनडेत त्याने दमदार कमबॅक केले. पण कसोटी संघात त्याच्यासाठी जागा होत नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो चांगला खेळतोय. सातत्य कायम राखत त्याला कसोटी संघात निश्चित कमबॅक करता येईल." या आशयाच्या शब्दांत आगरकरांनी मुंबईकर श्रेयस अय्यरनं कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न कायम ठेवावे असे म्हटले आहे.
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
दोन शतकासह रणजी स्पर्धेत ४८० धावा, तरीपण...
श्रेयस अय्यरनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्यफळीतील आपली ताकद दाखवली आहे. गत हंगामातील रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने मुंबईकडून ६८.५७ च्या सरासरीनं ४८० धावा काढल्या आहेत. यात त्याने दोन शतकेही झळकावली आहेत. पण त्याचे हे प्रयत्न अजित आगरकारांना पुरेसे वाटत नाहीत, असेच त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात खेळली अखेरची कसोटी
श्रेयस अय्यरनं आतापर्यंत टीम इंडियाकडून १४ कसोटी सामने खेळले असून २४ डावात त्याने ५ अर्धशतकासह एका शतकाच्या मदतीने ८११ धावा केल्या आहेत. २०२१ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मैदानातून कसोटीत पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरनं मागील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या विशाखापट्टणमच्या मैदानात टीम इंडियाकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता.