Gautam Gambhir on Jasprit Bumrah, IND vs ENG: भारतीय संघाला पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडने ५ गडी राखून पराभव केले. पहिल्या डावात भारताने ४७१ तर इंग्लंडने ४६५ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताला ३६४ धावाच करता आल्या. इंग्लंडने ३७१ धावांचे आव्हान शेवटच्या दिवशी सहज पार केले. खराब क्षेत्ररक्षणाचा भारतीय संघाला जोरदार फटका बसला. अनेक झेल सुटले, अनेक वेळा चेंडू फिल्डरच्या हातून निसटून चौकार गेले. या साऱ्या गोंधळामुळे तब्बल पाच शतके ठोकूनही टीम इंडियाच्या पदरी पराभव आला. या पराभवानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने महत्त्वाचे विधान केले.
जसप्रीत बुमराह मालिकेतील सर्व पाच कसोटी सामने खेळण्यासाठी तयार होईल अशी क्रिकेटचाहत्यांना अपेक्षा होती. पण गौतम गंभीरच्या विधानाने आता टीम इंडियाचे आणि चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. "जसप्रीत बुमराहवरील ताण हलका करणे आणि त्याला योग्य पद्धतीने संघासाठी वापरणे हे आमच्यापुढचे पहिले आव्हान आहे. बुमराहवरील गोलंदाजीचे ओझे काही काळ हलके करण्यावर आमचा नक्कीच भर असेल. ती बाब अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेत आणखी खूप क्रिकेट खेळायचे आहे. बुमराह संघात असेल तर काय करू शकतो याची साऱ्यांनाच कल्पना आहे. पण दौरा सुरू होण्याआगोदरच हे निश्चित होते की बुमराह ३ कसोटी सामने खेळू शकेल. त्यातही आता ज्या प्रकारे कसोटी मालिका पुढे जाईल, त्यानुसार बुमराहचा फिटनेस पाहून निर्णय घेतला जाईल. सध्यातरी मी इतकंच सांगू शकतो की बुमराह नेमके कोणते दोन सामने खेळणार आहे हे आम्ही ठरवलेले नाही," असे गौतम गंभीरने स्पष्ट केले.
"आताच्या संघातील वेगवान गोलंदाजांबद्दल आताच बोलणे योग्य नाही. एका गोलंदाजाकडे पाच कसोटींचा तर दुसऱ्या गोलंदाजाकडे चार कसोटींचा अनुभव आहे. आणखी एका गोलंदाजाने अद्याप पदार्पणही केलेले नाही. आधी आपल्या संघात चार असे गोलंदाज होते, ज्यांनी ४० हून अधिक कसोटी खेळल्या होत्या. गोलंदाजांचा अनुभव ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा आफ्रिकेत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या नव्या पिढीच्या गोलंदाजांना आपण थोडा वेळ दिला पाहिजे," असे गंभीर अतिशय रोखठोकपणे म्हणाला.