इंग्लंडच्या मैदानातील मालिकेसह भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० जून पासून इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेसह चौथ्या हंगामातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात करेल. या आव्हानात्मक मालिकेआधी संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि शुबमन गिल यांनी संघातील खेळाडूंशी खास संवाद साधला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन या सर्वात अनुभवी तिकडीशिवाय इंग्लंडच मैदान मारण्यासाठी काय करावे लागेल? यावर टीम इंडियाच्या ताफ्यात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!कोच अन् कॅप्टन दोघांनी खेळाडूंशी साधला संवाद
भारतीय संघ सध्या इंग्लंडमधील लंडन येथील बेकनहम येथील मैदानात सराव करत आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार पहिल्यांदाच कसोटी संघात वर्णी लागलेल्या साई सुदर्शन आणि अर्शदीप सिंग याचे स्वागत करताना दिसत आहेत. एवढेच नाही कॅप्टन अन् कोच यांनी संघाला प्रोत्साहित करणारे भाषणही दिल्याचे दिसून येते.
कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, अन्...
नेट्स प्रॅक्टिस दरम्यान टीम इंडियातील खेळाडूंसोबत संवाद साधताना गौतम गंभीर म्हणाला आहे की, या दौऱ्याकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. पहिला मुद्दा हा की, आपण आपल्या तीन सर्वात अनुभवी खेळाडूंशिवाय मैदानात उतरणार आहोत. दुसरा म्हणजे आपल्याकडे देशासाठी काहीतरी करुन दाखवण्याची एक खास संधी आहे. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. प्रत्येक सत्र, प्रत्येक तासातील प्रत्येक चेंडूवर फोकस करा. जर हा मंत्र जपला तर हा दौरा अविस्मरणीय ठरू शकतो, अशा आशयाच्या शब्दांत गौतम गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.
गिल म्हणाला, नेट सेशनमध्ये या गोष्टीवरही भर द्या
रोहित शर्माच्या जागी टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाला शुबमन गिलनेही सवंगड्यांना खास संदेश दिला. नेट्समध्ये सराव करताना दबावात कसं खेळायचं यावरही भर द्या. आपली ताकद ओळखा अन् त्यानुसार नेटमधील सराव आणि प्रॅक्टिस मॅचला महत्त्व द्या, असे शुबमन गिलने म्हटले आहे.