दोन्ही डावांत शतकं ठोकणाऱ्या रिषभ पंतसह चार फलंदाजांनी सामन्यात ठोकलेली पाच शतकं, पहिल्या डावात इंग्लंडवर मिळवलेली आघाडी आणि यजमान संघासमोर विजयासाठी ३७१ धावांचं तगडं आव्हान ठेवल्यानंतरही हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडकडून पाच गड्यांनी पराभूत व्हावं लागलं. दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांचा स्वैर मारा, गचाळ क्षेत्ररक्षण आक्रमक वृत्तीचा अभाव यामुळे भारतीय संघाला चांगल्या कामगिरीनंतरही पराभूत व्हावं लागलं. दरम्यान, पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल याने संघाच्या झालेल्या पराभवामागचं कारण सांगितलं आहे. आमच्याकडे संधी होती, मात्र आम्ही काही झेल सोडले, तसेच तळाच्या फलंदाजांनी आवश्यक धावा जमवल्या नाही, हीच आमच्या पराभवाची प्रमुख कारणं ठरली, असे गिलने म्हटले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करत असलेल्या शुभमन गिलकडे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कसोटी विजय मिळवण्याची संधी चालून आली होती. या पराभवानंतर शुभमन गिल म्हणाला की, हा खरोखरच खूप चांगला कसोटी सामना झाला. आमच्याकडे संधी होती. मात्र आम्ही झेल सोडले. तसेच तळाच्या फलंदाजांना अपेक्षित धावा जमवता आल्या नाहीत. मात्र या संघाचा मला अभिमान आहे. एकंदरीत आम्ही खूप चांगले प्रयत्न केले. काल आम्ही ४३० च्या आसपास धावा जमवून डाव घोषित करण्याबाबत विचार करत होतो. मात्र तळाच्या फलंदाजांनी पुरेशा धावा काढता न आल्याने आमच्यासमोरील अडचणी वाढल्या.
गिल पुढे म्हणाला की, आम्ही तळाच्या फलंदाजांकडून अपेक्षित असलेल्या योगदानाबद्दल बोललो. मात्र आमचे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. पुढच्या सामन्यांमध्ये आम्हाला यात सुधारणा करावी लागणार आहे. या सामन्यात आमच्याकडून काही झेल सुटले. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर सहजपणे संधी मिळत नाही. आमचा संघ युवा आहे. तसेच सध्या शिकत आहे. या बाबींवर पुढच्या काळात चांगलं काम होईल, अशी अपेक्षा आहे, असेही त्याने सांगितले.