Join us  

वर्ल्ड क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा! तिन्ही फॉरमॅटमध्ये एकतर्फी वर्चस्व; WTC क्रमवारीतही अव्वल

team india no 1 in all formats: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 4:45 PM

Open in App

ICC Test Rankings Indian Team: इंग्लंडविरूद्धची मालिका मोठ्या फरकाने जिंकून भारतीय संघाने भीमपराक्रम केला. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली. टीम इंडियासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. सुरुवातीला ०-१ ने पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. विराट कोहली आणि मोहम्मद शमीसारखे अनुभवी खेळाडूही या मालिकेत खेळत नव्हते. तरीही युवा फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी दाखवत इंग्लिश संघाचा पराभव केला. कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.

रोहितसेनेने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकून आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. भारतीय संघाचे सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत १२२ रेटिंग गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघाचे ११७ रेटिंग गुण आहेत. इंग्लंडचा संघ १११ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर स्थित आहे.

भारताचे एकतर्फी वर्चस्व!न्यूझीलंडचा संघ १०१ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाशिवाय टॉप-१० मध्ये कोणताही बदल झालेला नाही. भारतीय संघ आधीच आयसीसी वन डे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचे १२१ रेटिंग गुण आहेत. तर आयसीसी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टीम इंडियाचे २६६ गुण आहेत आणि इथेही टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. अशाप्रकारे टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत आपला दबदबा निर्माण केला आहे. याशिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीतही भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने या मालिकेत सर्वाधिक ७१२ धावा केल्या. दोन द्विशतके झळकावून यशस्वीने शानदार कामगिरी केली. याशिवाय त्याने तीन अर्धशतकेही झळकावली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला 'प्लेअर ऑफ द सिरीज'चा पुरस्कार देण्यात आला. तर शुबमन गिलने या मालिकेत ४५२ धावा कुटल्या. याशिवाय मालिकेत पदार्पण केलेल्या सर्फराज खान आणि देवदत्त पडिकल यांनीही चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, गोलंदाजीत कुलदीप यादवने १९ बळी घेतले. तर आकाश दीपने पहिल्याच कसोटी सामन्यात तीन बळी घेण्याची किमया साधली. या युवा खेळाडूंमुळेच टीम इंडियाला मालिका ४-१ ने जिंकण्यात यश आले.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयसीसीजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाटी-20 क्रिकेटरोहित शर्मा