आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिले तीनही सामने जिंकत भारतीय क्रिकेट संघाने स्पर्धेच्या सुपर ८ फेरीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. आता भारतीय संघाचा चौथा साखळी सामना १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँडविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत तीनही सामने जिंकले असून, आता नेदरलँडविरुद्धच्या लढतीतही बाजी मारून विजयी घोडदौड कायम ठेववण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. मात्र सुपर ८ फेरीतील स्थान आधीच निश्चित झाल्याने भारतीय संघ या लढतीमध्ये संघात काही प्रयोग करून पाहण्याची शक्यता आहे.
सुपर ८ फेरीत भारतीय संघाची गाठ वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका यासारख्या बलाढ्य संघांशी पडणार आहे. त्यामुळे या लढतींसाठीची तयारी म्हणून संघातील इतर खेळाडूंना नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात आजमावून पाहिले जाण्याची शक्यता आहे. नेदरलँडचा संघ हा तुलनेने दुबळा असल्याने आणि या लढतीमधील निकालाचा गुणतक्क्त्यावर फारसा फरक पडणार नसल्याने या लढतीत भारतीय संघ काही बदलांसह खेळू शकतो.
त्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना सुपर ८ च्या लढतींपूर्वी विश्रांती दिली जाऊ शकते. त्यात जसप्रीत बुमराह हा ताप आल्यामुळे अमेरिकेविरुद्धच्या लढतीत खेळला नव्हता. तर हार्दिक पांड्या तिन्ही सामन्यात खेळला आहे. सुपर ८ फेरीतील लढतीमध्ये हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे या लढतीत ते खेळण्याची शक्यता कमी आहे.
नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराज याला संघात संधी मिळू शकते. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल राहिली आहे. अशा परिस्थितीत सिराज आणि इतर गोलंदाजांची कसोटी लागणार आहे.
याबरोबरच हार्दिक पांड्याला विश्रांती दिली गेल्यास त्याच्या अनुपस्थितीत शिवम दुबे याला डावाच्या सुरुवातीला गोलंदाजी दिली जाऊ शकते. तसेच हार्दिक पांड्या न खेळल्यास रिंकू सिंह आणि अक्षर पटेल यांना फलंदाजीसाठी अतिरिक्त वेळ मिळू शकतो. तसेच वॉशिंग्टन सुंदरलाही संघात संधी मिळू शकते.