Mohammad Kaif Jasprit Bumrah Rohit Sharma, IND vs SA T20 World Cup 2026: टीम इंडियाचा सुपर-८च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका आणि भारत दोन्ही संघांची सुरुवात खराब झाली होती. पण आफ्रिकेने मधल्या षटकांमध्ये पिच समजून घेत भागीदारी केली, तर भारतीय फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळून सामना गमावला. भारताने मोठ्या फरकाने सामना हरल्यानंतर त्याचा संघाच्या नेट रन रेटवर परिणाम झाला असून टीम इंडियाचे सेमीफायनलचे गणित बिघडले आहे. तशातच भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव घेतले आणि भारतीय संघाचे नेमके काय चुकले, याबद्दलही स्पष्टपणे सांगितले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कैफ काय म्हणाला?
"आपण (टीम इंडिया) ७ ते १५ या षटकांच्या कालावधीत सामना गमावला. कर्णधार सूर्यकुमारने जसप्रीत बुमराहची दोन षटके सुरुवातीलाच वापरून घेतली आणि उरलेली दोन षटके शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवली. पण रोहित शर्मा जेव्हा कर्णधार होता त्यावेळी त्याने बुमराहचा असा वापर कधीच केला नाही. त्याने अनेकदा बुमराहला मधल्या फळीत भागीदारी फोडण्यासाठी एक षटक दिले आहे. बुमराहच्या बॉलिंग स्पेलमध्ये खूप मोठे अंतर होते. तुमच्या संघात बुमराहपेक्षा मोठा मॅचविनर कुणीही नाही. त्याला पॉवरप्ले मध्ये केवळ एक षटक द्यायला हवे होते आणि ११ किंवा १२व्या षटकात एक षटक टाकायला हवे होते," असे स्पष्ट मत त्याने मांडले.
सामन्यानंतर आफ्रिकन कर्णधार काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेचीही फलंदाजी खराब झाली होती, पण नंतर पिच समजून घेत त्यांनी मोठी धावसंख्या उभारली. याच मुद्द्यावरून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने मत मांडले. "आमची कामगिरी उत्तम झाली. वेगळ्या पद्धतीच्या पिचवर आमच्या संघाच्या खेळाडूंनी पटकन परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यानुसार आपला खेळ फुलवला याचा आनंद आहे. आमच्या फलंदाजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही भागीदारी होती. मिलर आणि ब्रेव्हिस या दोघांनी दमदार फलंदाजी करत धावा केल्या आणि आम्हाला विजयाची आशा दिली. फलंदाजांनी हुशारी दाखवली. इगो बाजूला ठेव अन् धावा काढण्यावर लक्ष दे असं प्रत्येकजण स्वत:ला समजावत होता," असे मार्करम म्हणाला.