England Women vs India Women, 3rd ODI : इंग्लंडच्या चेस्टर-ले-स्ट्रीट येथील मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ८२ चेंडूत महिला वनडेत सातवे शतक साजरे केले. या शतकी खेळीसह एका बाजूला हरमनप्रीत कौर हिने माजी कर्णधार मिताली राज हिच्या विक्रमाशी बरोबरी केली. दुसऱ्या बाजूला भारतीय महिला संघाने निर्णायक लढत ३०० पारची करत इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरमनप्रीतची सेंच्युरी, जेमिमाची फिफ्टीसह टीम इंडियानं केली ३०० पारची लढाई
हरमनप्रीत कौरनं ८४ चैंडूत १४ चौकाराच्या मदतीने केलेल्या १०२ धावांच्या खेळीशिवाय जेमिमा रॉड्रिग्जनं ४५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. स्मृती मानधना ४५ (५४), हरलीन देओल ४५ (६५) आणि रिचा घोष ३८ (१८) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३१८ धावा केल्या. भारतीय महिला संघाने दुसऱ्यांदा इंग्लंडविरुद्ध ३०० पेक्षा अधिक धावा केल्या असून ३१८ ही भारतीय महिला संघाची इंग्लंडविरुद्धची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. २०२२ मध्ये भारतीय महिला संघाने ५ विकेट्सच्या बदल्यात इंग्लंड विरुद्ध ३३३ धावा केल्या होत्या.
मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड
हरमनप्रीत कौरनं केली माजी कर्णधार मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी
हरमनप्रीत कौरनं सातव्या शतकी खेळीसह महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या मिताली राजशी बरोबरी केली आहे. मितालीनं आपल्या कारकिर्दीत ७ शतके झळकावली आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या बॅटर्सच्या यादीत हरमनप्रीत कौर आणि मिताली राज आता संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत स्मृती मानधना अव्वल असून तिच्या खात्यात ११ शतकांची नोंद आहे.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अन्य रेकॉर्ड
हरमनप्रीत कौरनं ८२ चेंडूत शतक पूर्ण केले. भारतीय महिला बॅटरच्या भात्यातून आलेली ही दुसरी सर्वात जलद सेंच्युरी ठरली. भारतीय महिला संघाकडून सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावे आहे. याच वर्षी राजकोटच्या मैदानात तिने आयर्लंडविरुद्ध ७५ चेंडूत शतक झळकावले होते.
स्मृती मानधना प्रतिका जोडीचीही कमाल
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात करताना स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. मागील १४ वनडेत १० व्या वेळी दोघींनी पहिल्या विकेटसाठी ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केलीये. हा एक रेकॉर्डच आहे.
जेमिमानंही खास सामना केला अविस्मरणीय
जेमिमा रॉड्रिग्ससाठीही हा सामना खास होता. ती ५० वा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. अर्धशतकी खेळीसह तिने हा सामना खास केला. कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्यामुळेच टीम इंडियाने निर्णायक सामन्यात यजमान इंग्लंड संघासमोर ३१९ धावांचे तगडे आव्हान उभे केले.