Cheteshwar Pujara Speaks To Media After Retiring From All Forms Of Indian Cricket : भारतीय संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा निर्णय घेतल्यावर पुजाराने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला फेअरवेल मॅच मिळाली नाही, याबद्दल मनात खंत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या मुद्यावर भाष्य करताना त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे नाव घेत विषय संपवल्याचे पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला त्याबद्दल सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भूतकाळात जे झालं नाही त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही
न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी मालिकेत पुजाराला संधी मिळायला हवी होती, अशी चर्चा रंगली होती. पुजारा असता तर घरच्या कसोटी मालिकेतील निकाल वेगळा असता असेही बोलले गेले. याच मुद्यावरुन फेअरवेल मॅच मिळायला हवी होती, असे वाटते का? असा प्रश्न पुजाराला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, भूतकाळात जे झालं नाही त्यावर मी आता काहीच बोलणार नाही. कारण आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, असे तो म्हणाला. हा विषय वळवताना त्याने दिग्गजांसह युवा क्रिकेट संघासोबत खेळण्याची संधी मिळालाचा अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.
सचिन-द्रविड अन् धोनीसह या दिग्गजांचे घेतले नाव
२०१० ते २०२३ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनीधीत्व केले. या प्रवासात दिग्गजांसोबत खेळायची संधी मिळाली. मी भारतीय संघात पदार्पण केले त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणसह सेहवाग आणि गंभीर हे खेळाडू संघात होते. माही भाई (महेंद्रसिंह धोनी) कर्णधार होता. त्यानंतर भारतीय क्रिकेटमधील बदलत्या युगात युवा खेळाडूंसोबतही ड्रेसिंग रुम शेअर केली. भारतीय संघासोबतचा प्रवास खास अन् अविस्मरणीय असल्याचे सांगत संधी न मिळाल्याचा मुद्दा त्याने सकारात्मक घेत जे मिळालं त्यात समाधानी असल्याचे मत व्यक्त केले आहे.