ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय 'अ' संघ ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात कॅप्टन्सह अनुभवी केएल राहुल, अभिमन्यू ईश्वरन या मंडळींनी नांगी टाकल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. ६४ धावांत अर्धा संघ तंबूत परल्यानंतर ध्रुव जुरेल यांने लढवय्या वृत्ती दाखवून देत ऑस्ट्रेलियन मैदानात भारतीय संघाची लाज राखली.
१८६ चेंडूंत ८० धावांची आश्वासक खेळी
भारत 'अ' संघ शंभरीच्या आत गुंडाळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना तो एकटा ऑस्ट्रेलियाला भिडला. त्याने १८६ चेंडूंचा सामना करत ८० धावांची आश्वासक खेळी करत संघाच्या धावफलकावर सन्मानजनक धावसंख्या उभी केली. त्याने आधी देवदत्त पडिक्कल आणि त्यानंतर नीतीश रेड्डीच्या साथीनं डावाला आकार देत संघाची धावसंख्या १५० पार नेली.
भारतीय संघानं शून्यावर गमावल्या होत्या दोन विकेट्स
ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय 'अ' संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाच्या खाते उघडण्याआधी दोन गडी तंबूत परतले होते. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन ३ चेंडूचा सामना करत शून्यावर माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या साई सुदर्शनला खातेही उघडता आले नाही. संघाच्या धावफलकावर ९ धावा असताना लोकेश राहुलच्या रुपात संघाला दुसरा धक्का बसला. त्यानंतर ११ धावांवर ऋतुराज गायकवाडनंही तंबूचा रस्ता धरला. दोघांनी प्रत्येकी ४-४ धावा केल्या.
भारतीय 'अ' संघानं पहिल्या डावात केल्या १६१ धावा
ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या सामन्यात संघ संकटात असताना ध्रुव जुरेल एकटा लढताना दिसला. विकेट किपर बॅटरनं देवदत्त पडिक्कलच्या साथीनं ५३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर ध्रुव जुरेल याने नीतीश रेड्डी आणि तळाच्या फलंदाजांच्या साथीनं ९१ धावांची भर घालत संघाची धावसंख्या १६१ धावांपर्यंत नेली. ध्रुव जुरेल वगळता देवदत्त पडिक्कलच्या २६ धावा, नीतीश रेड्डीच्या १६ धावांसह प्रसिद्ध कृष्णानं केलेल्या १४ धावा वगळता अन्य एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.