Maharashtra Election 2019 : 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' हे लागलेले विशेषण जात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:36 IST2019-10-10T16:30:02+5:302019-10-10T16:36:11+5:30
परळीत फाईट चांगलीच होणार

Maharashtra Election 2019 : 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' हे लागलेले विशेषण जात नाही
औरंगाबाद : ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’असे आपण कधीही म्हटलेलो नाही. एका ठिकाणच्या सभेत पाच वर्षांपूर्वी विनोद तावडे यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपंकजा मुंडे होतील, असे भाकित केले होते. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचेही स्पष्ट झालेले होते. त्यावेळेपासून आपणाला ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे लागलेले विशेषण काही पाठ सोडत नाही, असा सावध पवित्रा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत घेतला.
मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री
‘नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी भाजप कटीबद्ध’ या मोहिमेतंर्गत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यात बोलताना त्यांनी भाजप सरकारने पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या आकडेवारींची माहिती सादर केली. या माहितीनंतर नुकत्याच झालेल्या सावरगाव येथील भगवान भक्तीगडवरील मेळाव्यात पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. अमित शहा यांचे भाषण सुरु झाल्यानंतर जनतेमधून सतत ‘ पंकजा मुंडे सीएम, पंकजा मुंडे सीएम’ च्या घोषणा देण्यात येत होत्या. याविषयी त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, घोषणा देणारे पदाधिकारी नव्हते. तसेच माझ्याही ओळखीचे नव्हते किंवा मी नियोजितही केलेले नव्हते. त्याला माज्या लेखी काहीही महत्व नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लोक आलेले होते. त्यांच्या ज्या भावना होत्या. त्याची दखल पक्षाध्यक्षांनी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
केलेल्या कामांबद्दल नेतृत्वाला कौतुक
औरंगाबादेतील मेळाव्याला पंतप्रधान, सावरगावला गृहमंत्री आणि आता परळीत प्रचारासाठी पंतप्रधान येणार आहेत. तेव्हा आपणाला भाजप नेतृत्व ओबीसी नेत्या म्हणून सादर करत आहे का? असा प्रश्न केला असता, त्यांनी भाजपात असे काही होत नसते. आपण केलेल्या कामांबद्दल नेतृत्वाला कौतुक असल्यामुळे असे होत असेल, असेही त्यांनी सांगितले.
परळी विधानसभेत टफ फाईट होणार
परळी विधानसभा मतदारसंघात फाईट चांगलीच टफ होणार आहे. लोकशाहीमध्ये एकतर्फी निवडणूक होत नसते. धनंजयसह इतरही उमेदवार आहे. त्यामुळे अतिआत्मविश्वास बाळगण्याची गरज नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. दोन वेळा बहिणीला दिले आता एकदा भावाला निवडून द्या असे आवाहन धनंजय मुंडे करत असल्याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी परळी ही काही आमची जहागिरी नाही. एकदा बहिणीला, एकदा भावाला असे काही नसते. जो कामे करेल त्याला लोक संधी देतील, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.