काँग्रेसमधील वाद मिटला अन् चंद्रपूरात नवा ट्विस्ट आला; भाजपाची खेळी, उद्धवसेनाचा महापौर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:33 IST2026-02-06T14:30:22+5:302026-02-06T14:33:46+5:30
काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर पडदा पडला असून पक्षश्रेष्ठींनी सत्ता-संतुलन साधत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत

काँग्रेसमधील वाद मिटला अन् चंद्रपूरात नवा ट्विस्ट आला; भाजपाची खेळी, उद्धवसेनाचा महापौर?
चंद्रपूर - महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता समीकरणात चंद्रपूरात रोज वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. याठिकाणी सर्वाधिक जागा जिंकूनही नेत्यांमधील गटबाजीने हातातील सत्ता गमावण्याची वेळ काँग्रेसवर येणार का असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपासोबत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिले सव्वा वर्ष महापौरपद दिल्यास भाजपासोबत जाण्याचा प्रस्ताव ठाकरेंनी दिला आहे. याबाबत भाजपाशी बोलणी सुरू असल्याचं समोर आले आहे.
चंद्रपूरात सत्ता स्थापनेसाठी भाजपा आणि ठाकरेंच्या सेनेची चर्चा सुरू आहे. त्यात पहिले सव्वा वर्ष महापौरपद मिळावे अशी उद्धवसेनेची मागणी आहे. मात्र पहिले आम्ही महापौरपद घेतो, त्यानंतर तुम्ही घ्या असं भाजपाने म्हटलं आहे. भाजपाकडे २४ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे पहिली टर्म आम्हाला महापौरपद मिळावे आणि दुसऱ्या टर्ममध्ये उद्धवसेनेचा महापौर करण्यात अडचण नाही. आम्ही प्रस्ताव दिला आहे. उद्धवसेनेला चंद्रपूरात महापौरपद करण्याची सुवर्णसंधी आहे. ती त्यांनी सोडू नये असंही भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटलं आहे.
बहुमत की संख्याबळ ?
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले असून मित्रपक्ष प्रहार जनसेवा (भाशेकाप) चे ३ सदस्य मिळून काँग्रेसकडे एकूण ३० संख्याबळ आहे. बसपचा १ व एआयएमआयएमचा १ नगरसेवक सोबत आल्यास हे संख्याबळ ३२ होते. सत्ता स्थापनेसाठी ३४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपाकडे स्वतःचे २३ आणि शिंदे गटाचा १ असा एकूण २४ संख्याबळ असून या आधारावर सत्ता स्थापन करणे भाजपासाठी आव्हानात्मक ठरत आहे. उद्धवसेनेचे ६, वंचित बहुजन आघाडीचे २ आणि अपक्ष २ असे मिळून १० नगरसेवक आहेत. येथे अपक्ष नगरसेवक गटात सहभागी नसल्याने त्यांची भूमिका नाकारता येत नाही. कोणतीही औपचारिक युती किंवा आघाडी न झाल्यास काँग्रेस ३२ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करू शकते. मात्र भाजपाचे २३ आणि उद्धवसेनेचे १० नगरसेवक एकत्र आल्यास भाजप महापौरपद मिळवू शकते. उद्धवसेना महापौर पदावर ठाम असून सत्ता काबीज करणे हाच जर भाजपाचा उद्देश असेल तर उद्धवसेनेला महापौरपद देण्याचा पर्याय पुढे आला आहे.
काँग्रेसमध्ये गटबाजी
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता शहराचे लक्ष १० फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीकडे केंद्रित झाले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर पडदा पडला असून पक्षश्रेष्ठींनी सत्ता-संतुलन साधत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार महापौरपद धानोरकर गटाकडे तर गटनेतेपद व उपमहापौरपद वडेट्टीवार गटाला देण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. स्थायी समिती सभापतीपद मित्रपक्षांसाठी राखीव ठेवले आहे असे वडेट्टीवार गटाकडून सांगण्यात येत आहे.