Share Market Closing: सलग तीन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजार सावरला. BSE Sensex ४९ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७४,६०८ वर बंद झाला, तर Nifty 50 ३३ अंकांनी वधारून २३,४१२ या स्तरावर पोहोचला. बाजारातील वाढ मर्यादित असली तरी सलग पडझडीनंतर आलेल्या या रिकव्हरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीसा आत्मविश्वास परतल्याचे दिसून आले.
मेटल सेक्टरची जोरदार कामगिरी
आजच्या व्यवहारात सर्वाधिक तेजी मेटल क्षेत्रात दिसून आली. निफ्टी मेटल निर्देशांक तब्बल ३ टक्क्यांहून अधिक वाढला. जागतिक बाजारात तांब्याच्या किंमती वाढल्याने देशांतर्गत धातू कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली. तज्ज्ञांच्या मते आफ्रिकेसह काही भागांमध्ये पुरवठा साखळीबाबत चिंता आणि चीनमध्ये तांब्याची मजबूत मागणी, या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय धातू बाजारात तेजी आली आणि त्याचा थेट फायदा भारतीय मेटल कंपन्यांना झाला.
ऑईल-गॅस आणि इन्फ्रास्ट्रक्चर शेअर्सलाही आधार
मेटल क्षेत्रासोबतच ऑईल अँड गॅस, इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांमध्येही चांगली खरेदी झाली. अलिकडच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी कमी किमतीत शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. दुसरीकडे IT क्षेत्र आणि ऑटो सेक्टरने बाजारावर दबाव कायम ठेवला. Nifty IT निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरला, तर ऑटो शेअर्समध्येही कमजोरी पाहायला मिळाली.
बाजार सावरण्यामागची प्रमुख कारणे
१. स्वस्त स्तरावर खरेदी- गेल्या चार ट्रेडिंग सत्रांत सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास ४ टक्क्यांनी घसरले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वस्त भावात खरेदी करण्यास सुरुवात केली.
२. आशियाई बाजारांचे सकारात्मक संकेत- जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि चीन या प्रमुख आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावरही झाला.
(टीप- हा गुंतवणूकाचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
