Indian Railway: भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील 'राजधानी एक्सप्रेस' ही तिच्या वेगवान प्रवासासाठी आणि आलिशान सुविधांसाठी ओळखली जाते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? देशात एक अशीही राजधानी एक्सप्रेस आहे, जी अंतर आणि वेळ या दोन्ही बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित करते. उत्तर भारताला थेट दक्षिण भारताशी जोडणारी ही रेल्वे म्हणजे 'तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस'. भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी ही रेल्वे देशातील सर्वात लांब पल्ल्याची राजधानी एक्सप्रेस आहे.
२८४३ किलोमीटरचा प्रवास
ही ट्रेन नवी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनपासून सुरू होऊन केरळची राजधानी तिरुवनंतपुरम सेंट्रलपर्यंत जाते. रेल्वे क्रमांक १२४३१/१२४३२ असलेली ही ट्रेन तब्बल २८४३ किलोमीटरचे अवाढव्य अंतर पार करते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी रेल्वेला साधारण ४२ तासांचा वेळ लागतो. सुमारे दोन दिवस चालणारा हा प्रवास भारतीय रेल्वेमधील एक अविस्मरणीय अनुभव मानला जातो.
७ राज्यांची सफर
या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ही रेल्वे भारतातील ७ मोठ्या राज्यांमधून धावते. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. प्रवाशांना उत्तर भारतातील वाळवंटी भागापासून ते पश्चिम घाटातील डोंगररांगा आणि दक्षिण भारतातील हिरव्यागार वनराईपर्यंतचे दर्शन एकाच प्रवासात घडते. ही ट्रेन केवळ वाहतुकीचे साधन नसून भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणारी एक 'चालती-फिरती' चित्रफीतच आहे.
वेळापत्रक आणि प्रमुख शहरे
'इंडिया रेल इन्फो'ने दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन हजरत निजामुद्दीन स्थानकातून सकाळी ६:१६ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११:३५ वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचते. या प्रदीर्घ प्रवासात ही रेल्वे देशातील अनेक प्रमुख शहरांतून आणि महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरून जाते.
'हाय-प्रायोरिटी'मुळे वेळेत पोहोचण्याची खात्री
राजधानी एक्सप्रेस असल्याने या ट्रेनला रेल्वे नेटवर्कमध्ये सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. ही ट्रेन केवळ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असल्याने वेळ वाचतो. पल्ला मोठा असूनही ही रेल्वे वेळेत पोहोचण्यासाठी ओळखली जाते. याशिवाय, खाद्यपदार्थ, स्वच्छता आणि आरामदायी प्रवासासाठी यात विशेष सुविधा मिळतात.
