Petrol- Diesel Price Hike: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली की, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. इंधन दरवाढीचा फटका केवळ गाडी चालवणाऱ्यांनाच बसत नाही, तर वाहतूक महागल्यामुळे भाजीपाला, रेशन आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूही महाग होतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की भारतात हे दर नक्की कोण ठरवते आणि दररोज सकाळी ६ वाजता किमती कशा बदलतात? जाणून घेऊया यामागचे नेमके गणित.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचा खेळ
भारत आपल्या गरजेच्या एकूण तेलापैकी मोठा हिस्सा परदेशातून 'कच्च्या तेलाच्या' स्वरूपात आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की, त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होतो. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती काय आहे, यावरही आयात खर्च अवलंबून असतो.
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
दर कोण ठरवतो?
भारतात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी तेल कंपन्या दर ठरवतात. नवीन नियमानुसार, जून २०१७ पूर्वी दर १५ दिवसांनी किमतींचा आढावा घेतला जात असे. मात्र आता 'डेली प्राईस रिव्हिजन' प्रणालीनुसार, दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि इतर खर्चांचा विचार करून कंपन्या हे दर अपडेट करतात.
किमतीत 'टॅक्स'चा मोठा वाटा
पेट्रोल-डिझेलच्या मूळ किमतीपेक्षा आपण जे पैसे मोजतो, त्यात कराचा हिस्सा मोठा असतो. यामध्ये दोन प्रकारचे कर मुख्य असतात. केंद्र सरकारकडून 'एक्साईज ड्युटी' आकारली जाते. तर, प्रत्येक राज्य सरकार आपापल्या परीने 'व्हॅट' वसूल करते. विशेष म्हणजे, प्रत्येक राज्याचा 'व्हॅट' दर वेगवेगळा असतो, म्हणूनच मुंबई आणि दिल्लीतील पेट्रोलच्या दरात आपल्याला मोठी तफावत पाहायला मिळते.
इंधनाचे दर अचानक का वाढतात?
इंधनाचे दर वाढण्यामागे प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची टंचाई निर्माण होणे, दोन देशांमधील युद्ध किंवा राजकीय तणाव, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणे आणि वाहतूक खर्च आणि डीलर कमिशनमध्ये झालेल्या वाढीमुळे होतात.
सर्वसामान्यांवर काय होतो परिणाम?
जेव्हा पेट्रोल-डिझेल महाग होते, तेव्हा मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचे भाडे वाढते. याचा परिणाम थेट शेतमाल आणि औद्योगिक उत्पादनांच्या किमतींवर होतो. थोडक्यात सांगायचे तर, इंधन दरवाढ ही केवळ वाहनधारकांसाठी नाही, तर महागाई वाढवणारा सर्वात मोठा घटक ठरते.
