मुंबई : एआयमुळे आयटी कंपन्यांच्या कामावर परिणाम होण्याची वाढती भीती आणि जागतिक व्यापारातील अनिश्चिततेमुळे आयटी कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळत असून मंगळवारीही ही घसरण कायम राहिली. आयटी कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याचा फटका शेअर बाजारालाही बसला असून, मंगळवारी 'सेन्सेक्स' १०६८ अंकांनी कोसळला असून निफ्टी २८८.३५ अंकांनी (१.१२ टक्के) घसरून २५,४२४.६५ वर स्थिरावला आहे. एकाच दिवसांत झालेल्या या मोठ्या पडझडीमुळे सामान्य गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आयटी क्षेत्र गेल्या तीन वर्षांपासून सतत दबावात असून त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न्स मिळाले आहेत.
गेल्या तीन वर्षात आयटी इंडेक्स १.८६%, एका वर्षात २५.७९%, ६ महिन्यांत १५.७४%, एका महिन्यांत २१.६३% तर एका आठवड्यात ८.०३ टक्क्यांनी कोसळला आहे. त्यामुळे आयटी कंपन्या व गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक व्यापारातील अनिश्चितता, अमेरिकेची धोरणे व मध्यपूर्वेतील तणाव यामुळे बाजार सध्या अतिशय संवेदनशील बनला आहे. आयटी क्षेत्रातील वाढीचा वेग कमी होईल, अशी भीती आहे. त्यामुळे अल्पकालीन काळात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांनी सध्या काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक राजकारणामुळे बाजार अस्थिर आहे. अशा वेळी घाबरून जाऊन शेअर्स विकण्याऐवजी संयम ठेवावा.
'आयटी' क्षेत्रातील पडझडीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक अतिशय विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.
का पडला शेअर बाजार?
एआयमुळे भविष्यात आयटी कंपन्यांच्या कामावर परिणाम होण्याची भीती.
नवीन टॅरिफ लागू करण्याच्या शक्यतेने जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण.
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत.
