पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला; या गावात चार दिवसांपासून चुलच पेटली नाही !

By सोमनाथ खताळ | Updated: June 8, 2024 18:07 IST2024-06-08T18:05:30+5:302024-06-08T18:07:23+5:30

पंकजाताई आमच्या देव आहेत. त्यांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याने व आता त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असल्याचे येथील हरिदास गिते यांनी सांगितले.

beed lok sabha election people of this village are upset with the defeat of Pankaja Munde | पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला; या गावात चार दिवसांपासून चुलच पेटली नाही !

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला; या गावात चार दिवसांपासून चुलच पेटली नाही !

कडा : आष्टी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगुळगव्हाण गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना एकगठ्ठा मतदान केले. परंतु त्यांचा पराभव झाल्याने चार दिवसांपासून गावकऱ्यांनी अन्नत्याग केला असून गावात चूलदेखील पेटली नाही.
आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण या गावची लोकसंख्या १२०० च्या घरात आहे तर मतदान १००० इतके आहे. गावाने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत ९२६ एवढे मतदान केले.

विशेष म्हणजे या गावात इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला एकही मतदान झाले नाही; पण एवढी निष्ठा ठेवून मेहनत घेत गावाने एकगठ्ठा मतदान करूनदेखील निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यामुळे या गावातील महिला, पुरुष, लेकराबाळांसह चार दिवसांपासून गावातील एकाही घरात चूल पेटवली नसल्याने उपाशीपोटी बसले आहेत. ताईचे राजकारणात पुनर्वसन झाल्याशिवाय गावात चूल पेटणार नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

पंकजाताई आमच्या देव आहेत. त्यांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याने व आता त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असल्याचे येथील हरिदास गिते यांनी सांगितले.

आमची मुंडे कुटुंबावर निष्ठा आहे. पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव हा जिव्हारी लागला असून वरिष्ठ नेत्यांनी नियोजन करून ताईंना केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आमची मागणी असून शुक्रवारी गावातील मंदिरात लोकांनी अन्नत्याग आंदोलन केल्याचे गावचे सरपंच तुकाराम गिते यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: beed lok sabha election people of this village are upset with the defeat of Pankaja Munde