आर्थिक, वैवाहिक इ. प्रश्नांवर ज्योतिषांचा सल्ला नेमका कधी घ्यावा? यावर तज्ञांचे मार्गदर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:11 IST2022-07-27T12:10:42+5:302022-07-27T12:11:11+5:30

Astrology : उठसूट प्रश्न घेऊन ज्योतिष शास्त्रात उपाय शोधणे योग्य नाही आणि दहा ठिकाणी दहा जणांचे मार्गदर्शन घेणे हेही योग्य नाही. मग मध्य कसा गाठावा ते जाणून घ्या!

When exactly to consult an astrologer on Financial, marital etc. questions? Expert guidance on this! | आर्थिक, वैवाहिक इ. प्रश्नांवर ज्योतिषांचा सल्ला नेमका कधी घ्यावा? यावर तज्ञांचे मार्गदर्शन!

आर्थिक, वैवाहिक इ. प्रश्नांवर ज्योतिषांचा सल्ला नेमका कधी घ्यावा? यावर तज्ञांचे मार्गदर्शन!

>> अस्मिता दीक्षित (ज्योतिष अभ्यासक)

एखादा प्रश्न विचारून आपल्या शंकेचे समाधान करून घेणे हा मनुष्य स्वभाव आहे. भविष्याच्या उदरात काय आहे ह्याबद्दल आपल्या मनात अनेकविध प्रश्न असतात . काही लोकांचे प्रश्न रास्त असतात तर काहीना प्रश्न विचारण्याचा चाळा असतो. असे लोक रोज काहीना काही प्रश्न विचारतच असतात. 

ज्योतिष शास्त्र हे दैवी शास्त्र आहे . ह्या शास्त्राचा आधार घेवून आपण आपल्या मनातील प्रश्नांचा मागोवा घेवू शकतो. प्रश्न कर्त्याने प्रश्न मनापासून विचारला असेल आणि प्रश्न पाहणार्याची सुद्धा तितकीच तळमळ असेल तर हे शास्त्र आपल्याला अचूक उत्तरापर्यंत नेऊन पोहोचवते यात शंकाच नाही आणि अनेकांनी त्याची प्रचीती घेतलीच असेल. एखादी समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्न पाहू नये हा ह्या शास्त्राचा दंडक आहे. उठसुठ ज्योतिष बंद केले पाहिजे . वेळ जात नाही म्हणून हे शास्त्र नाही .त्यामुळे प्रश्नाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन जातकाने प्रश्न विचारला पाहिजे आणि ज्योतिषाने तो पाहिलाही पाहिजे. 

सध्याच्या प्रगत युगात मानवी मनाला अनेक प्रश्न ,समस्या भेडसावत असतात . त्यापैकी बहुतांश प्रश्न हे शिक्षण , नोकरी व्यवसाय कि दोन्ही , परदेशगमन , वास्तू , कर्ज , विवाह , संतती , आरोग्य ह्या विषयाभोवतीच रुंजी घालत असतात . अनेक वेळा ह्या समस्या खूप गहन असतात अशावेळी योग्य मार्गदर्शनासाठी जातक ह्या दैवी शास्त्राचा आधार घेवू पाहतो आणि त्यात काहीच गैर नाही. 

प्रश्न कधी पहावा ह्यासाठी काही नियम आहेत. एखाद्या व्यक्तीला खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल आणि त्याने त्यासंबंधी प्रश्न विचारला तर योग्य आहे. अनेक स्थळे पाहूनही योग्य जोडीदार मिळाला नाही तर त्यासंबंधी विचारलेला प्रश्न रास्त आहे पण आपण आपल्याकडून काहीही प्रयत्न न करता उठसुठ प्रश्न विचारले तर कसे होणार अश्यावेळी मिळालेले उत्तर सुद्धा चुकीचेच असेल कारण म्हंटलेच आहे ना प्रयत्नांती परमेश्वर .

प्रश्न पाहणाऱ्याची तळमळसुद्धा विचारणाऱ्या व्यक्ती इतकीच असली तर उत्तर हमखास बरोबर येते. पूर्वीच्या काळी प्रश्न विचारणाऱ्या जातकाने ज्योतिषाकडे फळे , सुगंधी फुले आणि दक्षिणा घेवून जाऊन त्यांना नमस्कार करून आणि ह्या शास्त्रावर अगाध श्रद्धा ठेवुन प्रश्न विचारण्याची पद्धत होती. आजकालच्या कलियुगात फळे फुले नकोत पण निदान ज्योतिषाचे मानधन आणि त्याला सन्मानपूर्वक वागणूक हि तरी नक्कीच अपेक्षित आहे. त्याचे मानधन न देता फुकट प्रश्न विचारू नये . कुणाचेही पैसे चुकवले तर शेवटी आपल्याला त्यालाच म्हणजे वरच्याला उत्तर द्यायचे आहे ह्याचा विसर पडू देऊ नये. आपला स्वतःचा प्रश्न ज्योतिषाकडे घेवून जावा . इतरांचे प्रश्न ज्याचे त्यालाच विचारू द्यावेत . प्रश्नांची खैरात न करता अत्यंत आवश्यक असा प्रश्न विचारावा . समोरच्याच्या आणि आपल्याही वेळेला किंमत आहे . 

ज्योतिष शास्त्र हे पुरातन शास्त्र आहे आणि दिवसागणिक त्याबद्दल कुतूहल वाढताना दिसते . पण आपल्याकडे म्हण आहे ना “ अर्ध्या ह्ळकुंडाने पिवळे होणे “ ती अगदी योग्य आहे. आजकाल सोमवारी एक मंगळवारी दुसरा ज्योतिषी असे १० ज्योतिषांचे सल्ले घेणे चालू असते त्यामुळे आपल्याकडे आलेला जातक सुद्धा अगदी सहज बोलून जातो ह्याने मला असे सांगितले आणि त्याने मला तसे सांगितले. आपल्याकडून गेल्यावर सुद्धा तो अजूनही १० जणांकडे जाणार असतो. मला ह्या सगळ्या गोष्टींचे नेहमीच नवल वाटत आले आहे आणि मनात एक प्रश्न नेहमी येतो कि असे का होत असावे? पहिल्या ज्योतिषाकडे गेल्यावर आपल्याला हवे ते ऐकायला मिळाले नाही म्हणून दुसऱ्याच्या  घराची पायरी चढायला लागली कि हा एक चाळाच लागला आहे. असो सुज्ञास सांगणे न लगे.

अनेकदा आजारपणाचे प्रश्न असतात. अशावेळी जातकाची मनस्थिती बरी नसल्यामुळे ज्योतिषाने आपल्या मानधनाचा प्रश्न दुय्यम ठेवावा ,त्याबद्दल काहीच बोलू नये. आपले पैसे कुठेही जात नाहीत देतील ते नंतर म्हणून शांत राहावे. अनेकदा एखाद्या व्यक्तीची समस्या गंभीर असते, व्यक्तीचे हाल बघवत नाहीत म्हणून शेवटी ज्योतिषाला “ ह्या व्यक्तीकडे अजून किती वेळ आहे ?” असाही प्रश्न विचारला जातो . आपण समजू शकतो हे विचारताना सुद्धा त्या व्यक्तीला किती क्लेश होत असावेत . पण तरीही अश्या प्रश्नांची उत्तरे किबहुना असे प्रश्न सुद्धा टाळावेत कारण जन्म ,विवाह आणि मृत्यू हि कार्ड देवाने आपल्याकडेच ठेवली आहेत . जरी एखाद्या ज्योतिषाला त्याच्या साधनेमुळे किंवा ज्ञानामुळे मृत्यू कधी होणार हे समजले तरीसुद्धा त्याबद्दल त्याने वाच्यता करू नये. येणारा एक दिवस जाणारच आहे. 

जन्मलग्न कुंडली हि जातकाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सक्षम असतेच पण त्याहीउपर काही विशिष्ठ गोष्टींसाठी जर प्रश्न पाहायचा असेल तर प्रश्न कुंडलीचा वापर करावा .फक्त उठसुठ ह्या शास्त्राला वेठीस धरू नये . अनेकदा एखाद्या व्यक्तीला दोन स्थळे एकाच वेळी आवडतात किंवा दोन ठिकाणांहून नोकरीसाठी पत्र येते किंवा दोन वास्तू आवडतात . अश्यावेळी कुठला चोईस करावा असे प्रश्न विचारले जातात जे रास्त आहेत . प्रश्नशास्त्र हे स्वतःच एक अखंड दालन आहे. ह्या दालनात शिरण्याचे सुद्धा अनेक मार्ग आहेत जसे पारंपारिक ज्योतिष किंवा कृष्णमुर्ती पद्धती अजूनही कितीतरी आहेत.
 
कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये आपल्याला त्या दिवसाचे ग्रह घेवून प्रश्नाचे उत्तर देता येते . अनेकदा ह्या शास्त्राची टर उडवली जाते पण २५ लोक घरी एखाद्या समारंभासाठी आलेले असताना वीज गेली तर त्या क्षणी ती कधी येणार ह्यापेक्षा दुसरा महत्वाचा प्रश्न घरातील गृहिणीसाठी दुसरा असूच शकत नाही . त्यामुळे अश्या प्रश्नांची उत्तरे देणार्या कृष्णमुर्ती पद्धती ह्या शास्त्रासमोर नतमस्तक आहे. 

एकदा तर एका स्त्रीने मला तिचा कित्येक वर्ष अंथरुणाला खिळलेल्या नवऱ्याकडे अजून किती अवधी आहे हे विचारले होते . मला खरच खूप वाईट वाटले कारण मनात प्रेम असूनही त्यांचे तिला करणे आता शक्यच नव्हते .हतबल होऊन तिने हा प्रश्न विचारला होता . मी काय बोलणार शेवटी प्रार्थना हेच आपल्या हाती आहे ती करत राहावी.

आपल्याला ज्योतिष येते म्हंटल्यावर जवळचे मित्र मंडळी , आप्तेष्ट उठसुठ काहीतरी विचारत बसतात ,अगदी काळा वेळेचेही भान न ठेवता मग मंडई असो कि बस स्टोप  त्यांचे विचारणे चालूच असते. जसे आज क्रिकेट मध्ये कोण जिंकणार , पेट्रोल चे भाव कमी होणार कि नाही , सरकार कुणाचे ? एक ना दोन लोकांकडे रिकामा वेळ खूप आहे पण ज्योतिषाने तारतम्य ठेवुन ह्या प्रश्नांची दखल सुद्धा घेवू नये .

जातकाने स्वतः प्रश्न विचारावा मग तो फोन वर सुद्धा चालेल पण स्वतःचा प्रश्न हस्ते परहस्ते विचारू नये .एकच वेळी अनेक प्रश्न पहिले असता उत्तर चुकीचे मिळण्याची शक्यता असते . कुंडलीत मनाचा कारक चंद्र म्हणून त्याला अनन्य साधारण असे महत्व आहे. चंद्रा भोवातीच प्रश्नशास्त्र फिरते आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मनाचे प्रतिबिंब  प्रश्नकुंडली मध्ये दिसतेच .प्रश्न कुंडलीलाच नाही तर ज्योतिष शास्त्राला सुद्धा अनेक मर्यादा आहेत .कृष्णमुर्तीनी ह्या मर्यादा विस्तृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

जातक आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर घेऊनच आलेला असतो . त्यामुळे योग्य वेळी अत्यंत तळमळीने विचारलेल्या प्रश्नासाठी हे दैवी शास्त्र मदतीला येणारच ह्यात तिळमात्र शंका नाही . ज्योतिषी जेव्हा प्रश्न पाहत असेल त्यावेळची वेळ घेवून प्रश्नकुंडली पहावी . प्रश्नशास्त्र आणि निसर्ग ह्यांचे अतूट नाते आहे . निसर्ग आपल्याला संकेत देत असतो फक्त ते समजण्याची क्षमता आपल्यात अनेकदा कमी पडते . अनेकदा हे संकेत इतके बोलके असतात कि प्रश्नकुंडली मांडायची सुद्धा निष्णात ज्योतिषाला आवश्यकता भासत नाही. जसे विवाहाचा प्रश्न असेल आणि सनई किंवा मधुर संगीत कानावर आले, कुणीतरी घरात मिठाई घेवून आले तर तो शुभसंकेत समजावा .एखादा शेअर मार्केट चा प्रश्न असेल आणि बाल्कनीत वरून खाली एखादे जळमट आले तर हा शेअर विकत घेवू नये असे सांगावे. कुत्र्याचे रडणे विव्हळणे ऐकू आले आणि आजाराचा प्रश्न असेल तर हा संकेत अशुभ समजावा . अश्या अनेक संकेतांचा उपयोग आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचवतो. 

प्रश्न कुंडलीत लग्नेश , कारक ग्रह आणि चंद्राची स्थिती अत्यंत महत्वाचे आहे . चंद्र ज्या स्थानात असतो त्याच भावाशी जातकाचा प्रश्न निगडीत असतो. अश्या प्रकारे प्रश्न शास्त्र हे जातकाच्या कुठल्याही प्रश्नाचे अचूक उत्तर देणारे शास्त्र आहे. ज्योतिषाची परीक्षा बघण्याच्या हेतूने अथवा चाळा म्हणूनही प्रश्न विचारला तर उत्तर हमखास चुकणार . ह्या शास्त्राचा गैरवापर करू नये. हे दैवी शास्त्र आहे आणि ते आपल्या मदतीला सदैव आहे . जातक आणि ज्योतिषी ह्यांनी ह्यासाठी बंधनकारक असणारे सर्व नियम पाळले तर हे दैवी शास्त्र तुम्हाआम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल ह्यात दुमत नाही.

Web Title: When exactly to consult an astrologer on Financial, marital etc. questions? Expert guidance on this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app