Maharashtra Election 2019 : सिंधुदुर्गात नवे महाभारत लिहिले; नारायण राणेंना अप्रत्यक्ष ‘धृतराष्ट्र’ म्हटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 16:28 IST2019-10-09T16:26:25+5:302019-10-09T16:28:36+5:30
Sindhudurg Vidhan Sabha Election 2019 : सिंधुदुर्गातील हत्याकांड, मारामाऱ्यांचा पाढाच वाचला.

Maharashtra Election 2019 : सिंधुदुर्गात नवे महाभारत लिहिले; नारायण राणेंना अप्रत्यक्ष ‘धृतराष्ट्र’ म्हटले
मुंबई : राज्यभरात शिवसेना-भाजपा युती असली तरीही सिंधुदूर्गात मात्र युती तुटलेली आहे. खासकरून कणकवली-देवगड मतदारसंघात शिवसेना आणि भाजापाचे अधिकृत उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून भाजपामध्येही दोन गट पडले आहेत. देशपातळीवरचे महाभारत आता कणकवलीतही रचण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणेंना पुत्रप्रेमात आंधळा झालेला ‘धृतराष्ट्र’ म्हटले आहे. तर निलेश आणि नितेश राणे यांना दुर्योधन-दुःशासन या बंधूंच्या जोडीची उपमा दिली आहे.
महाभारतात कर्णाने कौरवांच्या बाजुने युद्ध केले होते. इथे मात्र तो संदर्भ बदलला आहे. नारायण राणे यांचा उजवा हात समजले जाणारे आणि शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना कर्णाची उपमा दिली आहे. त्यांच्यासारखी सदगुणी व सदाचारी व्यक्ती इतकी वर्षे चुकीच्या गोटात सामील झाली होती परंतु त्यांनी योग्य वेळी शिवसेनेत प्रवेश करून या अपप्रवृत्तींची साथ सोडल्यामुळे त्यांना संपुर्ण ताकदीनिशी सर्वतोपरी मदत करणे, हे मी माझे परमकर्तव्य समजतो, असे भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी म्हटले आहे. फेसबूकवर त्यांनी भलामोठा इतिहासच लिहिला आहे. यामध्ये त्यांनी आमदार वैभव नाईक यांचे काका श्रीधर नाईक हत्येपासून सत्यविजय भिसे खून, रमेश गोवेकर बेपत्ता, अंकुश राणेंची हत्या आदी प्रकरणे मांडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात संदीप सावंत या राणेंच्या पदाधिकाऱ्याला जाळून मारण्याचेही प्रकरण यामध्ये घेतलेले आहे.
कणकवली मतदारसंघाच्या विकासाबाबतीत बोलायचे झाल्यास ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ आणि ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या दोन्ही म्हणी आजच्या घडीला या मतदारसंघासाठी लागू पडतात, असा थेट आरोप संदेश पारकर यांनी केला आहे. तसेच गोवा टोल नाक्यावरील राडा, लोकसभेआधी रत्नागिरीतील राडा आदी राणे पूत्रांची कामे त्यांनी यामध्ये मांडत त्यांना दुर्योधन-दुःशासनची उपमा दिली आहे. नाणार रिफायनरीवरून आदोलनावेळी सत्ताधाऱ्यांना धमक्या देत भाजपात प्रवेश मिळवल्याचाही आरोप पारकर यांनी केला.