मंत्री नितेश राणेंकडून द्वेष पसरवण्याचा उद्योग; मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, आमदार इद्रिस नायकवडी यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:11 IST2025-06-06T18:10:05+5:302025-06-06T18:11:49+5:30
'राजकीय पोळी भाजण्यासाठी असा उद्योग करणाऱ्या नितेश राणे यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल'

मंत्री नितेश राणेंकडून द्वेष पसरवण्याचा उद्योग; मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, आमदार इद्रिस नायकवडी यांची मागणी
मिरज : राज्यात जातीय सलोखा बिघडवण्यासाठी बकरी ईद विषयी वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात द्वेष पसरवण्याचे काम मंत्री नितेश राणे यांच्याकडून सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी असा उद्योग करणाऱ्या नितेश राणे यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा आमदार इद्रिस नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री नितेश राणे या वाचाळवीरास समज देण्याची मागणी करणार असल्याचेही आमदार नायकवडी यांनी सांगितले.
आमदार नायकवडी म्हणाले, नितेश राणेसारख्या अपरिपक्व माणसाला आम्ही यापुढे उत्तर देत बसणार नाही, तर त्यांचा बंदोबस्त करू. ते म्हणाले, दररोज हजारो बकरी कापली जातात. मग, ईदला बकरे कापण्यास आक्षेप घेण्याचे कारण काय? ईदला प्रतिबंधित जनावरे कापली जाणार नाहीत. कायदा पाळण्याच्या सूचना सर्व मशिदीतून देण्यात आल्या आहेत. मुस्लीम समाज संयमी आहे, नितेश राणे यांनी त्यांची वादग्रस्त वक्तव्य थांबवली नाहीत, तर मात्र यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही आमदार नायकवडी यांनी दिला.
सुरेश खाडे यांच्याबाबत ते म्हणाले, आपल्या ज्ञानाचं कोणी कसं प्रदर्शन करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, गेली पंधरा वर्षे आमदार असणाऱ्या आमदार खाडे यांनी बजेट विषयी अभ्यास करून मगच बोलावे. राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयाचा निधी येऊनही मिरजेच्या समस्या सोडवण्यात आमदार खाडे कमी पडल्याची टीका आमदार नायकवडी यांनी केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील अजितदादा गटात कधी प्रवेश करणार याबाबत माहीत नसल्याचेही आमदार नायकवडी यांनी सांगितले.
आमदार सुरेश खाडेंसोबत कार्यक्रमाला जाणार नाही
यापूर्वी आमदार सुरेश खाडे यांनी मिरजेला मिनी पाकिस्तान असे संबोधल्याने त्यांच्यासोबत कार्यक्रमाला जाणार नाही, असे जाहीर केले होते. याबाबत आजही ठाम असून त्यांच्यासोबत मी कार्यक्रमाला जात नसल्याचा दावा आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला.