सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मोठा धक्का, वैभव पाटील भाजपात प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:21 IST2025-06-10T13:19:36+5:302025-06-10T13:21:26+5:30
खानापूरच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार

सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मोठा धक्का, वैभव पाटील भाजपात प्रवेश करणार
विटा : डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी उद्धवसेनेला धक्का देत शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर आता खानापूर मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसत असून माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील व त्यांचे सुपुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा आज मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.
विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्षपद घेतले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत खानापुरात महायुतीकडून आमदार सुहास बाबर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या पक्षाची उमेदवारी घेत विधानसभेची निवडणूक लढविली.
या निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार सदाशिवराव पाटील, वैभव पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत सहभागी होण्याची इच्छा नेत्यांकडे व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांपूर्वी विट्यात झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणून भाजप प्रवेशाचा आग्रह केला होता.
विटा नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने सत्ताधारी पक्षात सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत नेत्यांनीही व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांनी भाजपात जाण्याचा अंतिम निर्णय घेतला. त्यामुळे आज मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते ॲड. सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश होत आहे.
खानापूरच्याराजकारणाला नवी कलाटणी मिळणार
खानापूरचे माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील व ॲड. वैभव पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने विट्यासह खानापूर मतदारसंघातील राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच मेळावा
माजी आमदार सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विट्यात पक्षाचा मोठा मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यात वैभव पाटील समर्थक कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या मेळाव्याची तारीख पक्षप्रवेशानंतर निश्चित करण्यात येणार आहे.