अलीकडे मुंबईमध्ये घडलेली एक घटना सोशल मीडियावर खूप चर्चेत आली. तो व्हिडिओ तर तुम्हीही पाहिलाच असेल. मंत्रीमहोदयांना ठणकावणारी एक महिला. प्रचंड ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यानं तिचा संताप अनावर झाला आणि तिने रस्त्यावरच आरडाओरडा केला. तिचं म्हणणं होतं की, "मला माझ्या मुलाला शाळेतून आणायला जायचं आहे आणि गेला एक तास मी इथेच अडकून आहे!" आता अर्थातच चर्चा सुरु झाली की त्या बाईचं म्हणणं बरोबर होतो, लोकांचा संताप साहजिक आहे, ट्राफिकमध्ये जीव गुदरमतो. (viral)कुणी म्हणते हा सोशल मीडिया प्रसिध्दी स्टंट आहे. इथे प्रश्न तो नाही, मुद्दा असा आहे की तासंतास पालक ट्राफिकमध्ये अडकतात. मुलांच्या व्हॅन आणि स्कुलबस अडकतात. उन्हातान्हात सगळ्यांना त्रास होतो, तरी लोकांना राग येऊ नये असं म्हणून कसं चालेल?
आज हजारो पालक रोज मुलांना शाळेत सोडणं-आणणं या कामासाठी धावपळ करत असतात. वेळेवर पोहोचणं ही केवळ सोय नसून जबाबदारी असते. शाळांचे बदलते नियम जसे की वेळेनंतर गेटच बंद करुन टाकणार वगैरे गोष्टी या चिंतेत आणखी भर घालतात. अशा वेळी जर अचानक रस्ते बंद झाले, ट्रॅफिक तासन्तास तसंच राहीलं, तर अस्वस्थता वाढणं स्वाभाविक आहे. मुलं शाळेत थांबलेली असतात, काही वेळा घाबरलेलीही असतात. पालकांचा फोन लागत नाही, वेळ निघून जातो ही चिंता खरीच आहे, बनावटी नाही.
म्हणूनच, अशा प्रसंगी 'ती ओरडली' यापेक्षा 'ती का ओरडली?' हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. रॅली, मोर्चे, आंदोलने हे लोकशाहीचा भाग आहेत, पण त्याचवेळी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होतो, हे ही तितकंच खरं आहे. हा प्रकार काही नवा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाहतूक कोंडी होतच असते. (mumbai)यातून एक गोष्ट स्पष्ट होते, समस्या केवळ त्या महिलेच्या वागण्याची नाही, तर संपूर्ण व्यवस्थेची आहे. योग्य नियोजन, पर्यायी मार्ग, आणि नागरिकांना आधीच माहिती दिली गेली तर अशा घटना टाळता येऊ शकतात.(traffic)
याच काळात शाळेच्या बस चालकांच्या आक्रमक वर्तनाचे व्हिडिओही समोर आले. काही ठिकाणी चालक बेफिकीरपणे गाडी चालवताना, इतरांशी वाद घालताना दिसले. तर काही चक्क मुलांसमोरच शिवीगाळ करताना दिसतात.
शाळेच्या मुलांच्या सोयीसाठी ठेवलेली बस, तिचा चालक कसा असावा हा मुद्दा किरकोळ नाही. रस्त्यावरची वाढती असहिष्णुता मुलांच्या मानसिकतेवर आणि सुरक्षिततेवरही परिणाम करते. त्यामुळे पालकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. बस चालक कसा आहे, रिक्षावाले काका कसे आहेत याची माहिती असावी. तसेच मुलांना सोडायला जाताना किंवा आणायला जाताना रस्त्याचा अंदाज घ्यावा. शिक्षकांना तशी कल्पनाही द्यावी. मुद्दा काय, पालकांचा स्ट्रेस किती वाढलेला असतो पाहा, त्याचा विचार कुणीच करत नाही.
