- गौरी पटवर्धन (मुक्त पत्रकार)
या जगात आयांना सगळ्यात जास्त भीती वाटणारी कुठली गोष्ट असेल, तर ती म्हणजे शाळकरी मुलांची उन्हाळ्याची सुटी ! या सुट्टीची भीती वाटण्याची अनेक कारणं असतात. सुटी खूप मोठी असते. घरातल्या इतर माणसांना सुटी नसते. बाहेर ऊन असल्याने पोरांना बाहेर पिटाळता येत नाही(how parents should engage kids in vacation).
मुलांच्या बाजूने विचार केला, तर सुटी लागणार याची खूपच एक्साइटमेंट असते; पण सुट्टी लागल्यावर काहीच दिवसात ‘आता मी काय करू?’ हे एकच वाक्य रिपीट मोडवर मुलं बोलू लागतात. घडत काहीच नाही आणि मस्त दोन महिन्यांची सुट्टी सगळी संपून जाते. आपण सुट्टीत काहीच केलं नाही अशी रूखरूख मुलांपासून मोठ्यांपर्यंत (how to handle kids boredom during holidays) सगळ्यांच्या मनाला लागून राहते. मग करायचं काय?
सुटीचं नियोजन कसं करता येईल?
१. सगळ्यात पहिलं म्हणजे सुट्टीचे मनातल्या मनात चार भाग करायचे. प्रत्येक भाग साधारण १५ दिवसांचा होतो. त्यापैकी पहिला भाग जो असतो तो मुलांवर सोडून द्यायचा. सुट्टी लागल्या लागल्या मुलांना खूप उत्साह असतो. त्यांचे आपापसात वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतात. त्यादिवसात त्यांना हवं ते, जे शक्य ते करू द्यावं.
२. पंधरा-वीस दिवसांनंतर मुलांना कंटाळा येऊ लागतो. मग त्यांनाच त्यातून मार्ग काढायला सांगावा. मुलांना एक प्रॅक्टिकल चौकट आखून देऊन त्यात काहीतरी प्लॅन करायला सांगावं. या टप्प्यात मुलांच्या मित्रमैत्रिणींना आपल्याकडे एखादी रात्र राहायला बोलावणं, बाहेरगावी राहणाऱ्या भावंडांना राहायला बोलावणं किंवा मुलं मोठी असतील तर त्यांना काका-मामा-आत्या-मावशी-आजी-आजोबा यांच्याकडे थोडे दिवस राहायला पाठवणं हे करता येऊ शकतं.
३. एव्हाना मे महिन्याचा मध्य आलेला असतो. अशावेळी मुलांना करायला मजा येईल अशा ॲक्टिव्हिटी शोधून ठेवणं ही एक उपयुक्त स्ट्रॅटेजी असते. अर्थात या ॲक्टिव्हिटीज मुलांचं वय, पालकांना काय करणं शक्य आहे यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतात; पण तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, त्या ॲक्टिव्हिटी भरपूर वेळ चालणाऱ्या पाहिजेत. पॉट आइस्क्रीमचा प्लॅन करायचा. सिनेमा बघणे हा पूर्ण दिवसाचा प्रोग्रॅम असला पाहिजे. म्हणजे घरीच बघितला तरी त्याला ‘मूव्ही आफ्टरनून’ म्हणायचं. हॉलमध्ये गाद्या, उश्या, लोड/तक्के, सतरंज्या असं सगळं घालून माहौल बनवायचा आणि मग सिनेमा बघायचा.
४. सुट्टी लागल्या लागल्या मुलांना शिबिराला जायचं नसतं कारण त्यांना खेळायचं असतं. मात्र सुट्टी अर्ध्याहून जास्त संपली की मात्र त्यांना तीच शिबिरं रंजक वाटायला लागतात. सुट्टी शेवटच्या टप्प्यात आली की राखीव शिबिर शस्त्र बाहेर काढायची किंवा एखादी ट्रिप प्लॅन करायची असेल.
काय नको?
सुटी याचा अर्थ अमर्याद स्क्रीन टाइम नाही. दुसरं म्हणजे सुटीत एखादी तरी नवीन गोष्ट, एखादं तरी नवीन काम, नवीन कौशल्य मुलांनी शिकलं पाहिजे. भरपूर वाचलं पाहिजे. सगळं करण्याची अट एकच ‘सुट्टीत फार मजा आली’ असं मुलांना वाटलं पाहिजे. कारण मोठं झाल्यानंतर सुट्टीच्याच आठवणी जास्त असणार आहेत.
