फळं खाणं जास्त चांगलं की ज्यूस पिणं, हा प्रश्न अनेकांना पडतो. विशेषतः उन्हाळ्यात किंवा आरोग्याची काळजी घेताना लोक फळांपेक्षा ज्यूसला अधिक पसंती देतात. ताज्या फळांचा रस शरीराला पटकन ऊर्जा देतो, थंडावा मिळवून देतो आणि चवीलाही छान लागतो. (Fruit or juice? Which is more nutritious? Because of this one mistake, you don't get the full nutrition from fruits...)मात्र आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर संपूर्ण फळं खाणं हे ज्यूस पिण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे का?
फळं थेट खाल्ल्याने शरीराला त्यातील नैसर्गिक फायबर भरपूर प्रमाणात मिळतं. हे फायबर पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतं, पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतं आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही उपयोगी ठरतं. सफरचंद, पेरू, संत्री, पपई किंवा मोसंबीसारखी फळं चावून खाल्ल्याने शरीराला पोषक घटक हळूहळू मिळतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. याच कारणामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठीही फळं खाणं अधिक योग्य मानलं जातं.
दुसरीकडे, ज्यूस बनवताना फळांमधील बरंचसं फायबर कमी होतं. विशेषतः गाळलेला रस पिताना शरीरात फक्त नैसर्गिक साखर आणि काही जीवनसत्त्वं जातात. त्यामुळे ज्यूस प्यायल्यानंतर लवकर भूक लागू शकते. काही वेळा बाजारात मिळणाऱ्या पॅकबंद ज्यूसमध्ये अतिरिक्त साखर, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्हही असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात.
तरीही ज्यूस पूर्णपणे वाईट आहे असं नाही. घरच्या घरी ताज्या फळांचा रस करून घेतला तर तो शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करू शकतो. आजारी व्यक्ती, लहान मुलं किंवा ज्यांना फळं चावून खाणं कठीण जातं त्यांच्यासाठी ज्यूस उपयोगी ठरतो. मात्र त्यात साखर टाकणं टाळणं गरजेचं आहे. शक्य असेल तर गाळलेला रस न पिता फायबरसह स्मूदी तसेच मिक्सरमधून काढलेला तसाच चोथ्यासकट असलेला रस घेणं अधिक फायदेशीर ठरतं.
आजकाल अनेक जण सकाळच्या नाश्त्याऐवजी फक्त ज्यूस घेतात. पण त्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही. कारण फळं चावून खाण्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, तर ज्यूस पटकन पचतो. त्यामुळे वारंवार भूक लागण्याची शक्यता वाढते.
आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर रोजच्या आहारात संपूर्ण फळांचा समावेश करणं अधिक योग्य ठरतं. ताजा घरचा ज्यूस चालू शकतो, पण फळांची जागा पूर्णपणे ज्यूसने घेणं योग्य नाही. त्यामुळे फळं खा आणि ज्यूस मर्यादित प्या हा नियम पाळला तर शरीराला जास्त फायदा होऊ शकतो.
