प्रवासाचा वेग वाढणार; हायस्पीड मार्गामुळे पुणे-मुंबई दीड तासात तर हैद्राबादला ४ ते ५ तासात जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:14 IST2026-02-02T12:13:41+5:302026-02-02T12:14:05+5:30
पुणे ते हैदराबाद मार्गामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमधील औद्योगिक, व्यापारी व्यवसायाला चालना मिळणार आहे

प्रवासाचा वेग वाढणार; हायस्पीड मार्गामुळे पुणे-मुंबई दीड तासात तर हैद्राबादला ४ ते ५ तासात जाण्याची शक्यता
पुणे : मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन/सेमी हायस्पीड) रेल्वे कॉरिडॉर बनवणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी रविवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकात केली. या दोन प्रकल्पांमुळे रेल्वे प्रवासाचा वेळ कमी होणार असून, दळणवळणाचा वेग वाढणार आहे. यामुळे आयटी, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, हायस्पीड मार्गामुळे पुणे-मुंबई दरम्यानचे अंतर केवळ एक ते सव्वा तासात गाठता येणार आहे.
हायस्पीड रेल्वे मार्ग भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे-मुंबई दरम्यान सध्या रेल्वे किंवा रस्तेमार्गे प्रवासासाठी सुमारे ४ ते ५ तास लागतात. प्रस्तावित हायस्पीड रेल्वेमुळे हा प्रवास अवघ्या एक ते सव्वा तासांत होऊ शकते. तसेच पुणे ते हैदराबाद दरम्यान रेल्वे प्रवासाला आठ ते दहा तास वेळ लागतो. हायस्पीड रेल्वे मार्ग झाल्यावर चार ते साडेचार तासांत प्रवास होण्याची शक्यता आहे. पुणे ते हैदराबाद मार्गामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमधील औद्योगिक, व्यापारी व्यवसायाला चालना मिळणार आहे. या रेल्वेसाठी स्वतंत्र लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यामुळे या प्रकल्पासाठी मार्गाची पाहणी, तांत्रिक अभ्यासाच्या आढावाला गती मिळणार आहे. या दोन मार्गांसह इतर पाच हायस्पीड मार्गांची घोषणा झाल्यामुळे आराखड्यास (डीपीआर) तयार करण्यासाठी लवकरच ग्रीन सिग्नल मिळेल.
हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे संभाव्य फायदे
- पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ ३ ते ४ तासांवरून एक ते दीड तासापर्यंत कमी होणार
- पुणे-हैदराबाद प्रवासाचा वेळ ८ ते ९ तासांवरून ४ ते ५ तासांपर्यंत घट
- उद्योग, आयटी, शिक्षण व आरोग्य क्षेत्राला मोठा लाभ
- पर्यावरणपूरक वाहतूक व कार्बन उत्सर्जनात घट
- रस्ते व विमान प्रवासावरील ताण कमी होणार
प्रकल्पाच्या ठळक बाबी...
- भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
- रेल्वेचा वेग - २२० ते ३५०
- पुणे-हैदराबाद अंतर - ५५६
- महाराष्ट्राबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मार्ग जाणार
- प्रमुख शहर - पुणे, सोलापूर, वाडी
प्रवास होणार सुकर
- हायस्पीड रेल्वे २५० ते ३०० किमी/तास वेगाने धावते.
- हायस्पीड रेल्वे कार व विमानांच्या तुलनेत कमी कार्बन उत्सर्जन करते.
- त्यामुळे प्रदूषण कमी होते. हरित ऊर्जेला चालना मिळते.
- शहरांचा विकास, उद्योगधंद्यांना चालना, पर्यटन वाढ आणि रोजगारनिर्मिती होते.
- स्टेशन परिसरात व्यापारी केंद्रे विकसित होतात. आर्थिक विकासाला गती मिळते.
- प्रगत सिग्नलिंग प्रणाली, स्वतंत्र ट्रॅक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अपघातांची शक्यता खूप कमी असते.
- कमी कंपन, आरामशीर आसने, शांत वातावरण आणि आधुनिक सुविधा मिळतात.
