दौंडमधील धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 18:04 IST2021-11-03T18:03:39+5:302021-11-03T18:04:51+5:30
गळफास घेण्यापूर्वी महिला पोलिसाने आपल्या भावाच्या मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली

दौंडमधील धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या
केडगाव : दौंड तालुकयातील देलवडी येथे पालघर येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपाली बापुराव कदम (वय 26 वर्ष सध्या रा. लोकरी माणिकपूर वसई मुंबई ) असे कर्मचाऱ्याचे नाव असुन गळफास घेण्यापूर्वी तिने आपला भाऊ रोहित याला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक वाल्मीक गजानन अहिरे (रा. पालघर मुंबई) यांच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन वर्षापूर्वी दिपाली कदम यांची पोलीस खात्यामध्ये असणाऱ्या वाल्मीक अहिरे यांच्याशी ओळख झाली. अहिरे हा वारंवार दीपालीस ओळखीचा गैरफायदा घेऊन शारीरिक व मानसिक त्रास देत होता. दिपालीचे नुकतेच लग्न ठरले होते. ३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी दिपाली चा साखरपुडा झाला होता. येत्या 16 नोव्हेंबर रोजी दीपाली व मयूर कांबळे यांचा शुभविवाह ठरला होता.
साखरपुडा व लग्नामुळे दिपाली सध्या तिच्या मूळ गाव देलवडी ता. दौंड येथे होती. सदर लग्न जमल्याची माहिती अहिरे यांना समजताच त्यांनी नवरदेव मयूर कांबळे यांचे वडील दत्तात्रय कांबळे(राहणार भोसरी पुणे) यांना फोन करून दिपाली संदर्भात माहिती दिली. त्यानंतर सदर बाब मयूर कांबळे यांचे वडील दत्तात्रय कांबळे यांनी दिपालीचे वडील बापुराव कदम यांच्या कानावर घातली. वाल्मीक आहिरे याने मंगळवार दिनांक दोन रोजी रात्रीच्या सुमारास दिपाली चा भाऊ रोहित फोन करून तुम्ही तिचे इतर कोणाशी लग्न करू नका नाहीतर तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी दिली.
मंगळवारी रात्री सर्व कुटुंबीयांनी दिपाली हिस समजावून सांगितले. बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन दीपालीने आत्महत्या केली. यासंदर्भात दिपालीचा भाऊ रोहित कदम यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करत आहे. त्यानंतर बुधवारी ४.०० सुमारास दीपालीवरती शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.