PMC Elections : भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बेरजेचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:43 IST2025-12-24T14:43:35+5:302025-12-24T14:43:56+5:30
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राज्यात शिंदेसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते.

PMC Elections : भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बेरजेचे राजकारण
पुणे : महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार)ने कंबर कसली आहे. भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार)ने सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) बरोबर आघाडी करून बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राज्यात शिंदेसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार), तसेच उद्धवसेना आणि शिंदेसेना तयार झाले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी निवडणूक झाली. यामध्ये महायुतीने बाजी मारली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत बसले.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे समोरासमोर येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार)ला पुणे महापालिका निवडणुकीत एकटे पाडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार)ने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना ३९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर दोन अपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी (अजित पवार)कडे ३१, तर राष्ट्रवादी (शरद पवार)कडे १० माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार)ची ताकद शहरात जास्त आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या लढल्यास भाजपलाच फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास ते भाजपला काही प्रमाणात का होईना रोखणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी (अजित पवार)ने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.