भाजप हा वैचारिक पक्ष राहिलेला नसून तो आता व्यापारी तत्वावर चालणारा पक्ष - सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 21:09 IST2026-01-21T21:09:19+5:302026-01-21T21:09:52+5:30
मुंबईत मराठी मतदारांना मतदानच करता येणार नाही, अशी नीती भाजपकडून आखण्यात आली होती. अशा परिस्थितीतही आमच्या ६५ जागा निवडून येणे, हा मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास आहे

भाजप हा वैचारिक पक्ष राहिलेला नसून तो आता व्यापारी तत्वावर चालणारा पक्ष - सुषमा अंधारे
पुणे : भाजप हा आता वैचारिक पक्ष राहिलेला नाही, तर तो व्यापारी तत्वावर चालणारा पक्ष झाला आहे. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत भाजपचे केवळ सात आकडे वाढले आहेत. त्यामुळे त्यांनी फार उन्मादी होऊ नये, अशी टीका उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त बालगंधर्व कलादालन येथे आयोजित केलेल्या ‘शतकवीर बाळकडू’ या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हाणाल्या, मुंबईत मराठी मतदारांना मतदानच करता येणार नाही, अशी नीती भाजपकडून आखण्यात आली होती. अशा परिस्थितीतही आमच्या ६५ जागा निवडून येणे, हा मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास आहे. हा विश्वास सत्तेपेक्षाही लाखमोलाचा आहे. आमच्या १६ जागा केवळ ५० ते ७५ मतांच्या फरकांनी पडल्या. त्या १६ जागा निवडून आल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते. भाजप जर खर्या अर्थाने विजयी झाली असती तर त्यांना अन्य कोणाला कुबड्या मागायची गरज पडली नसती. रविंद्र चव्हाण आणि अमित साटम सारख्या आर्ध्या हाळकुंडाने पिवळे झालेले आहेत. भाजपला प्रत्येक वेळी खोटे पण रेटून बोलायची सवय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
तर शाह सेनेला पाप लागेल
यंदाचे वर्षे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शताब्दी वर्ष आहे. मुंबई महापालिकेवर कायम भगवाच फडकला पाहिजे, हिंदुहृदयसम्राट यांचा संकल्प होता. आज जर तो भगवा फडकू शकला नाही, तर त्याचे पाप शाह सेनेला लागेल. निवडणूकीनंतर शिंदे सेनेला स्वत:ची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी ठाकरे यांच्या नावाचा वापर करावा लागत आहे, असा टोला अंधारे यांनी लगावला.
राष्ट्रवादी संपवण्यासाठी लांडगेंच्या माध्यमातून प्रयत्न
महापालिका निवडणूकीतील वागणूकीवरून भाजप वापरते आणि नंतर फेकून देते हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कळून चुकले असेल. नवी मुंबईत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा उद्धार केला तर पिंपरी-चिंचवडमध्ये महेश लांडगे हे अजित पवार यांच्यावर टीका करत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांची छुपी संमती असल्याशिवाय हे दोघे एवढ्या पातळीवर जाणे शक्य नाही. पुण्यात राष्ट्रवादीला संपण्यासाठीच लांडगे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले, असेही अंधारे यांनी नमूद केले.