PCMC Election 2026: पिंपरीत भाजपच्या सत्तेत दडपशाही; चुकीच्या कामांवर फायलीवर सही नाही केली तर दमदाटी, अजित पवारांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 21:22 IST2026-01-08T21:21:05+5:302026-01-08T21:22:42+5:30
PCMC Election 2026 शहरातील कार्यकर्ते मला भेटल्यावर दहशत असल्याचे सांगतात. त्यामुळे या शहराची शांतता धोक्यात आली आहे

PCMC Election 2026: पिंपरीत भाजपच्या सत्तेत दडपशाही; चुकीच्या कामांवर फायलीवर सही नाही केली तर दमदाटी, अजित पवारांचा घणाघात
पिंपरी : भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेत दडपशाही वाढली. चुकीच्या कामांवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या. फायलीवर सही नाही केली तर दमदाटी केली जाते. त्यामुळे अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. २०१७ मध्ये चुकीचे बटन दाबून चूक केली होती, त्या चुकीची पुनरावृत्ती करू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी-चिंचवड येथे प्रचारसभेत केले आहे. भोसरीतील आमदारांच्या कार्यालयाजवळ शीतलबाग पादचारी पुलाचे काम सुरुवातीला सत्तर लाखाला दिले होते. पण तो पूल पूर्ण होईपर्यंत सात कोटीपर्यंत खर्च कसा जातो? या पुलावरून एक माणूस जात नाही. त्यातून कोणाचे भले झाले हेही बघितले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्या, असा घणाघात त्यांनी भाजपच्या स्थानिक आमदारांवर यावेळी केला.
पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडला नऊ वर्षांत या वाईट प्रवृत्तींनी दृष्ट लावली. धनश्री कन्स्ट्रक्शन कंपनीची उलाढाल बघा. शहरातील ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्या कामांमध्ये २५० कोटींचा चुराडा केला आहे. तो पैसा करदात्यांच्या आहे. हरित सेतू प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे. त्यांना हरित सेतू करायला कोणी सांगितले? शहराची विस्कटलेली घडी बसविण्याची आता गरज आहे.
टीडीआर, एसआरए घोटाळे कोणी केले?
पवार म्हणाले की, रस्ता सफाई करणाऱ्या महिलांना रात्रीतून काम लावले जाते. मात्र, शहरातील कचरा उचलला जात नाही. त्यातून फक्त बिले उचलली जातात. कंत्राटदारांचे भले केले जाते. कुत्र्यांच्या नसबंदीसाठी सात कोटी रुपये यांनी खर्च केले तरीही कुत्र्यांना पिल्ले का होतात? टीडीआरचा आणि एसआरएचा घोटाळा केवढा मोठा आहे! कुदळवाडीतील साडेचार हजार अतिक्रमणे पाडली. त्यातून उद्योजक देशोधडीला लागले. त्यातून चर्चा करून मार्ग काढला जाऊ शकला असता. मात्र, तसे न करता थेट कारवाई करण्यात आली. त्याला कोण जबाबदार?
शहरात दहशत वाढली
पवार म्हणाले की, शहरातील कार्यकर्ते मला भेटतात. दहशत असल्याचे सांगतात. त्यामुळे या शहराची शांतता धोक्यात आली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर तिकडे गेलेल्यांना मी विचारले तर त्यांचे उत्तर, ‘आर्थिक अडचणीत सापडलो असल्यामुळे तिकडे जात आहोत’, असे येते. त्यांनी आधीच नऊ वर्षे महापालिका लुटून खाल्ली आहे. आता त्यांना हे साथ द्यायला हे चालले आहेत.