गुजरातचा मुंबईला 'दे धक्का', शेकडो व्यापाऱ्यांचे सुरतला स्थलांतर; कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 03:24 PM2023-10-25T15:24:26+5:302023-10-25T15:40:05+5:30

यामुळे महाराष्ट्र सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

Surat Diamond Bourse Open: गुजरातच्या सुरत शहराला डायमंड सिटी नावाने ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमणाता हिऱ्यांचा व्यापार आहे. सुरतशिवाय मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांचा व्यापार चालतो. पण, आता सुरतने मुंबईला मोठा झटका दिला आहे. याचे कारण म्हणजे, गुजरातमधील हिरे व्यापाऱ्यांनी सरकारच्या पाठिंब्याशिवाय सुरतमध्ये 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र तयार केले आहे.

'सुरत डायमंड बोर्स' नावाच्या या डायमंड हबला जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा खिताबदेखील मिळाला आहे. सुरतमध्ये बांधलेल्या या सूरत डायमंड बोर्समुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रुपात मोठा धक्का बसणार आहे. मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय सुरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

सूरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते. सुरत शहरातील हिऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये पैलू पाडलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात. या हिरे उद्योगामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो. सुरतच्या हिरे कारखान्यात पैलू पाडलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागले.

पण आता या स्वतंत्र कार्यालयाची गरज राहणार नाही, कारण गुजरातमधील सुरत येथे बांधण्यात आलेले जगातील सर्वात मोठे डायमंड हब गुजरातच्या हिरे व्यवसायांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. त्यामुळेच आता मुंबईतून जगभरात हिरे व्यवसाय करणारे सुरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपली कार्यालये बंद करून सुरतला स्थलांतरित होत आहेत.

सुरत डायमंड असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सूरत डायमंड बोर्स समिती सदस्य दिनेश भाई नावडिया यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या ड्रीम सिटी प्रकल्पाच्या खजोद परिसरात 14 मजल्यांचे 9 टॉवर्स 67 लाख चौरस फूट जागेवर बांधण्यात आले आहेत. या टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची 4300 कार्यालये आहेत. इमारती तयार होण्यापूर्वीच ही कार्यालये हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती. हे सुरत डायमंड हब अंदाजे 3400 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे. सुरत आणि मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणता यावे, म्हणून हिरे व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त किंमत देऊन सरकारकडून ही जमिन खरेदी केली होती.

दिनेश भाई म्हणाले की, आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये हिरे पाठवण्यासाठी सुरतच्या व्यावसायिकांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय आणि कर्मचारी ठेवावे लागत होते. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्यांना मुंबईतूनच व्यवसाय करावा लागत होता. पण आता सुरत डायमंड बोर्समध्ये हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत. जगातील सर्वात मोठे कस्टम हाउस तयार आहे. आता सुरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार आहेत, त्यामुळे आता सुरतचे हिरे व्यापारी मुंबईऐवजी सुरतमधून हिऱ्यांचा व्यवसाय करू शकणार आहेत.

दिनेश भाई यांनी सांगितले की, सुरत डायमंड बोर्स सुरू झाल्यामुळे सुरतच्या रिअल इस्टेटलाही मोठा फायदा झाला आहे. मुंबईतून स्थलांतरित होणाऱ्या लोकांना नवीन घराची गरज आहे, त्यामुळे लोक त्यांची घरे खरेदी करत आहेत. याशिवाय शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. शॉपिंग मॉल्समध्ये खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सूरत डायमंड बोर्स सुरू झाल्यामुळे सुरतच्या प्रत्येक भागातील लोकांना फायदा होईल. याशिवाय जवळपास 1 लाख लोकांना एकाच छताखाली रोजगारही मिळणार आहे. दिनेश भाईंनी सांगितले की, सूरत डायमंड बाजार उघडल्यानंतर मुंबईतील हिरे व्यवसायाशी संबंधित सुमारे 1000 कार्यालये कायमची बंद होतील. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र सरकारचेही कोट्यवधी रुपयांचे कराचे नुकसान होणार आहे.

सुरतचे मोठे हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी यांनी आपला व्यवसाय पूर्णपणे मुंबईतून स्थलांतरित केला आहे. ते किरण डायमंड एक्सपोर्ट नावाने देशात आणि जगात हिऱ्यांचा व्यवसाय करतात. वल्लभभाई लखानी यांनी आपले हिरे जगातील विविध देशांना पाठवण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत कार्यालय उघडले होते. त्यांच्या कार्यालयात सुमारे 2500 लोकांचा स्टाफ असायचा. सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यामुळे सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना परदेशात हिरे पाठवण्यासाठी मुंबईशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

लखानी यांनी सांगितले की ते मूळचे भावनगरचे आहेत. 1980 मध्ये व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले आणि तिथे हिऱ्यांची कंपनी सुरू केली. भारत डायमंड बोर्सचे मुख्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे होते. त्यांनी 1997 मध्ये सुरतमध्ये व्यवसाय सुरू केला. किरण जेम्सची वार्षिक उलाढाल सुमारे 17,000 कोटी रुपये आहे, तर आणखी एक ज्वेलरी कंपनी आहे ज्याची उलाढाल सुमारे 3,000 कोटी रुपये आहे.

वल्लभभाई लखानी यांनी सांगितले की त्यांनी आपला व्यवसाय मुंबईतून पूर्णपणे बंद केला आहे आणि आता सुरतला हलवला आहे. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी त्यांनी सध्या विविध इमारतींमध्ये 1200 फ्लॅट बांधले आहेत. सुरत डायमंड बोर्सचे औपचारिक उद्घाटन होताच कंपनीने बांधलेल्या घरांमध्ये कर्मचारी राहू लागतील. कर्मचार्‍यांसाठी बांधलेल्या घरांमध्ये सर्व घरगुती वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई कार्यालयात फक्त 100 कर्मचारी गुजराती आहेत, बाकीचे कर्मचारी महाराष्ट्र आणि इतर राज्यातील आहेत, त्यापैकी बहुतेकांनी सुरतला येण्याचे मान्य केले आहे.