गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:39 IST2025-08-19T16:34:25+5:302025-08-19T16:39:16+5:30

Ganesh Chaturthi 2025: यंदा बुधवार २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला(Ganesh Chaturthi 2025) आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्याआधी घरात रंगरंगोटी, सजावट, आवराआवर केली जाते, यातच मुख्यत्त्वे एक काम आवर्जून केले पाहिजे, ते म्हणजे पुढील गोष्टी घराबाहेर काढणे!

घरात अशा अनेक वस्तू असतात ज्या केवळ जागा अडवत नाहीत तर त्या वास्तू दोषही निर्माण करतात. त्यालाच वास्तूच्या भाषेत राहू केतुचे प्राबल्य निर्माण करणाऱ्या वस्तू म्हटले जाते. बाप्पाला आपण मंगलमूर्ती म्हणतो, त्याच्या येण्याने सगळे काही मंगल होत असताना पुढील अमंगल गोष्टी घरात ठेवायच्याच कशाला? त्यासाठी ही तयारी आजच करा आणि आवराआवर करताना पुढील वस्तू घराबाहेर काढा. त्या नाही काढल्या तर काय दुष्परिणाम होऊ शकतात तेही जाणून घ्या.

वास्तुशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा कळत नकळत आपल्या दैनंदिन प्रगतीवर परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात सुख समृद्धी येण्याकरीता सर्व वस्तू सुस्थितीत असणे गरजेचे आहे. बंद पडलेल्या वस्तू आपल्या प्रगतीची दारे बंद करतात. हे आपल्या वास्तूच्या बाबतीत घडू नये म्हणून पुढील गोष्टींची घ्या काळजी.

बंद घड्याळ : घड्याळ आपल्याला वेळ दर्शवते. पुढचा काळ दाखवते. मात्र ते बंद पडले असेल, तर काळ आणि परिस्थितीदेखील स्थगित झाल्यासारखी होते. म्हणून घरात बंद पडलेले घड्याळ अजिबात ठेवू नका. तुमचे नशीब थांबून राहील. अपयशाचा काळ संपणार नाही. म्हणून बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करून घ्या अन्यथा टाकून द्या.

बिघडलेले कुलूप : आपल्या धनाचे, घराचे, कागदपत्राचे एवढेच काय, तर प्रवासात सामानाचे संरक्षण करण्यासाठी आपण कुलूपाची मदत घेतो. जेव्हा भाग्योदय होतो, तेव्हा नशीबाचे टाळे उघडले असे आपण म्हणतो. अशी कुलूपासारखी सामान्य परंतु अतिशय महत्त्वाची वस्तू बंद पडलेली असेल, तर ती घरात ठेवू नका. तुमच्या करिअरला कुलूप लागेल आणि प्रगती थांबेल.

तुटलेल्या चपला : अडगळ करण्याची सवय आपल्याला घातक ठरते. नवीन जोडे घेऊनसुद्धा जुन्या, तुटलेल्या चपलांमध्ये आपला जीव अडकलेला असतो. कधीतरी कामी येतील म्हणत चपलांची पोती प्रत्येक घराच्या कोपऱ्यात पडून असतात. परंतु वास्तुशास्त्र सांगते, झिजलेल्या चपला हे आपण केलेल्या संघर्षाचे प्रतीक आहेत. त्यांचा वापर झाला की टाकून द्या, अन्यथा तुमच्या आयुष्यातील संघर्ष वाढेल.

जुने फाटके कपडे : आताची परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी दसरा दिवाळीला नव्या कपड्यांची खरेदी केली जात असे. आता बारमाही शॉपिंग सुरू असते. कपाटात ठेवायला जागा नाही, एवढा कपड्यांचा ढीग आपल्याकडे असतो, तरीदेखील जुन्या कपड्यांची वेळीच विल्हेवाट लावली जात नाही. जुने फाटके कपडे दुर्भाग्य दर्शवतात. ते जमवून ठेवल्याने घरातून दुर्भाग्य जाण्याचे नाव घेत नाही.

देवतांचे जुने फोटो किंवा भग्न पावलेल्या मूर्ती : देवी देवतांच्या फोटोतून आपल्याला सकारात्मकता जाणवते. परंतु, ठराविक काळानंतर फोटो खराब स्थितीत झाले असता ते विसर्जित करावेत. तसेच देवांची भग्न पावलेली मूर्ती देवघरात न ठेवता नदीत विंâवा समुद्रात विसर्जित करावी. भग्न मूर्ती पाहून आपल्या मनात नकारात्मक भाव जागृत होतात आणि आपल्याला प्रसन्न वाटत नाही, म्हणून त्यात वेळोवेळी आवश्यक बदल केले पाहिजेत.