प्रियंका गांधींनी केले गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक; २५ दिवसांत मागणी पूर्ण केल्याबद्दल मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 08:47 IST2024-12-31T08:42:08+5:302024-12-31T08:47:23+5:30

केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांनी आश्वासन पूर्ण केल्याबद्दल वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आभार मानले आहेत.

Wayanad MP Priyanka Gandhi has expressed her gratitude to the Home Minister Amit Shah | प्रियंका गांधींनी केले गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक; २५ दिवसांत मागणी पूर्ण केल्याबद्दल मानले आभार

प्रियंका गांधींनी केले गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक; २५ दिवसांत मागणी पूर्ण केल्याबद्दल मानले आभार

Priyanka Gandhi on Amit Shah: काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. एवढेच नाही तर अमित शाह यांनी अवघ्या २५ दिवसांत आश्वासन पूर्ण केल्याबद्दल वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आनंद व्यक्त केला. प्रियंका गांधी यांनी ४ डिसेंबर रोजी संसदेच्या अधिवेशनादरम्यान शाह यांची भेट घेतली होती आणि वायनाडमधील विनाशकारी भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीला गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी केली होती. सोमवारी गृहमंत्र्यांनी त्यांची मागणी मान्य केली आणि वायनाड भूस्खलन ही गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली.

वायनाडच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे एक्स पोस्टमधून आभार मानले आहेत. गृह मंत्रालयाने वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत प्रियंका गांधी यांनी गृह मंत्रालयाचे आभार मानले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांच्या पुनर्वसनात मोठी मदत होईल, असे प्रियांका गांधी यांनी म्हटलं.

"अमित शाह यांनी अखेर वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्तीचा दर्जा दिला याचा मला खूप आनंद आहे. हे निश्चितपणे पुनर्वसनाची गरज असलेल्यांना मदत करेल आणि निश्चितपणे योग्य दिशेने एक पाऊल मानले जाईल. आता या कामासाठी वेळेत पैसे वाटून दिल्यास आम्ही खूप आभारी राहू," असं प्रियांका गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

काही दिवसांपूर्वी वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्याचबरोबर भूस्खलनग्रस्तांना केंद्र सरकारकडूनही मदत मागण्यात आली होती. सध्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांकडे कोणतीही मदत यंत्रणा उरलेली नाही. केंद्राने अनेक पावले उचलली पाहिजेत. मानवतावादी दृष्टिकोनातून या प्रकरणावर राजकारण करू नये आणि तेथील लोकांना मदत करावी, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले होते.

दरम्यान, वायनाडमध्ये २९ जुलैच्या रात्री अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. मुंडक्काई, चुरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा भूस्खलनामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सरकारी आकडेवारीनुसार, भूस्खलनामुळे २०० हून अधिक मृत्यू झाले, अनेक जखमी झाले आणि हजारो बेघर झाले.

केरळच्या इतिहासातील ही सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती असल्याचे म्हटलं जात आहे. केरळमधल्या आपत्तीसाठी २०२४-२५ मध्ये ३८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १४५.६० कोटी रुपयांचा पहिला हप्ता ३१ जुलै रोजी आणि १४५.६० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता १ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला.
 

Web Title: Wayanad MP Priyanka Gandhi has expressed her gratitude to the Home Minister Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.