पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:15 IST2025-06-01T12:13:58+5:302025-06-01T12:15:46+5:30
केरळमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दक्षिण व ईशान्य भारतात पावसाचा जोर कायम असून, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने प्रचंड जीवित व वित्त हानी झाली आहे. या दोन राज्यांत भूस्खलनासारख्या दुर्घटनांत आतापर्यंत अनुक्रमे ५ व ९ लोकांचा मृत्यू झाला असून, कर्नाटकात ७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, देशाच्या इतर भागांत ढगाळ वातावरण असून, काही भागांत हलक्या सरी पडल्या आहेत.
आसाममध्ये अनेक भागांत पूरस्थिती असून, गेल्या २४ तासांत भूस्खलनात ५ जण दगावले आहेत. सहा जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी मदत छावण्यांत हलवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने नागरिकांना वाचविले आहे.
अरुणाचल : भूस्खलनात वाहन वाहून गेले, ७ ठार
अरुणाचल प्रदेशात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. कामेंग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१३वर भूस्खलनात वाहन वाहून गेल्याने दोन कुटुंबांतील सात जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका भूस्खलनाच्या घटनेत दोघे दगावले. भूस्खलनानंतर हे वाहन दरीत कोसळले. यात वाहनातील सातही जणांचा मृत्यू झाला.
नागरिकांच्या घरात पाणी
केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, सखल भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो लोकांना मदत छावण्यात हलवण्यात आले आहे. राज्याच्या उत्तर भागांत रस्ते पाण्याखाली असून, जवळपास सर्वच भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: कासरगोड जिल्ह्यात मधुवाहिनी नदीला आलेल्या पुरात रस्ते वाहून गेले आहेत. अनेक वस्त्या पाण्याखाली आहेत.
ऊन-पावसाचा खेळ
या राज्यात गेल्या चोवीस तासांत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर जैसलमेरमध्ये ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. किशनगंजमध्ये सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
इंडोनेशियात खाण खचल्याने १७ ठार
सायरेबॉन : इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात खोदकाम सुरू असताना एक खाण धसल्याने १७ ठार तर अनेक जण बेपत्ता झाले. सायरेबॉन जिल्ह्यातील गुनुंग कुडा खदानीत भूस्खलन झाल्याने शुक्रवारी ही दुर्घटना घडली. दोन डझनहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबविल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत ढिगाऱ्याखालून १६ जणांचे मृतदेह व काही जखमींना बाहेर काढण्यात आले. एका जखमी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १७ झाली. ६ ते ८ कर्मचारी ढिगाऱ्याखाली दबलेले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव दल शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.