भाजपच्या ‘मिशन 10’ समाेर कडवी आव्हाने, २०१९च्या निकालाची करणार का पुनरावृत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 11:57 IST2024-03-29T11:57:31+5:302024-03-29T11:57:49+5:30

गेल्या निवडणुकीत भाजपने हरयाणातील सर्व १० जागा जिंकल्या होत्या.

BJP's 'Mission 10' facing tough challenges, why repeat 2019 results? | भाजपच्या ‘मिशन 10’ समाेर कडवी आव्हाने, २०१९च्या निकालाची करणार का पुनरावृत्ती?

भाजपच्या ‘मिशन 10’ समाेर कडवी आव्हाने, २०१९च्या निकालाची करणार का पुनरावृत्ती?

- राकेश जोशी

चंडीगड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरयाणात घडलेल्या विविध राजकीय, सामाजिक उलथापालथी पाहता आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ही आव्हाने मोडून काढताना २०१९ प्रमाणे विजयाची पुनरावृत्ती करणार का, याकडे राज्यातील जनतेचेच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.                                    

गेल्या निवडणुकीत भाजपने हरयाणातील सर्व १० जागा जिंकल्या होत्या. २०२४ मध्येही ‘मिशन १०’ साध्य करण्याचा भाजपचा मनोदय असला तरी यंदा पक्षापुढे आव्हानांचा डोंगर कायम आहे. गेल्या काही दिवसांत हरयाणातील भाजप आघाडी सरकारने शेतकरी आंदोलनाची केलेली हाताळणी, विविध घोटाळे, कुस्तीपटूंच्या मुद्द्यांवरून निर्माण झालेले वादळ यामुळे जनमानस घुसळून निघाले आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नायब सैनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी या वेगवान घडामोडी घडल्या. त्यामुळे भाजप अडथळ्यांना दूर सारत गेल्या निवडणुकीप्रमाणे यश मिळवतो का, याचीच उत्सुकता आहे.

पुन्हा इतिहास रचणार?
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निकालात नुसता इतिहास रचला असे नव्हे, तर सर्वच्या सर्व दहाही जागांवर विजय मिळवताना विरोधकांना चारी मुंड्या चीत केले होते.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला इतिहासाची पुनरावृत्ती करता येईल का, याची उत्सुकता आहे. भाजपने गेल्या रणधुमाळीत ५८.०२ टक्के मते मिळवली. काँग्रेस पक्षाला केवळ २८.४२ टक्के मते मिळवता आली होती.

Web Title: BJP's 'Mission 10' facing tough challenges, why repeat 2019 results?