“प्रज्ञा सातव यांना राजीनामा देण्यास भाग पाडले का, कोणाचा दबाव?”; अधिवेशनात विरोधकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 20:43 IST2026-02-24T20:39:43+5:302026-02-24T20:43:01+5:30
Vidhan Parishad News: विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होऊ नये, यासाठीच प्रज्ञा सावत यांचा राजीनामा घेतल्याचा दावा विरोधकांनी केला.

“प्रज्ञा सातव यांना राजीनामा देण्यास भाग पाडले का, कोणाचा दबाव?”; अधिवेशनात विरोधकांचा सवाल
Vidhan Parishad News: दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते स्व. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सातव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करीत प्रज्ञा सातव यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा सभापती राम शिंदे यांनी मंजूर केल्याचे जाहीर केले. यावरून विरोधकांनी विधान परिषदेत काही सवाल उपस्थित केले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विधान परिषदेत प्रज्ञा सातव यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. प्रज्ञा सातव या काँग्रेसमधून बिनविरोध निवडून गेल्या असल्याने विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होऊ नये, यासाठीच राजीनामा घेतल्याचा दावा विरोधकांनी केला. यावर सभापती राम शिंदे यांनी स्मितहास्य केले आणि विरोधकांना खासगीत माहिती देतो, असे सांगितले.
प्रज्ञा सातव यांना राजीनामा देण्यास भाग पाडले का, कोणाचा दबाव?
विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी सभागृहाला प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. यावर काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण मागितले आणि शंका उपस्थित केली. विरोधी पक्षनेतेपदाची निवड होऊ नये, म्हणून प्रज्ञा सातव यांना राजीनामा घेण्यास भाग पाडले का, असा सवाल सतेज पाटील यांनी केला. तर, प्रज्ञा सातव यांच्यावर कोणता राजकीय दबाव होता, असा सवाल करताना यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून आलेल्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर अडीच महिन्यांनी हरकती घेणे योग्य नाही. आपल्या अधिकारक्षेत्रात तो स्वीकारला. खासगीत भेटल्यास अधिक माहिती देतो, असे राम शिंदे यांनी यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांना सांगितले.