बत्ती गुलमुळे मुंबईकर घामाघूम, ‘बेस्ट’च्या ग्राहकांना फटका; आठवडाभर विजेचा लपंडाव सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:53 IST2026-04-30T11:52:49+5:302026-04-30T11:53:20+5:30
विजेच्या वाढत्या मागणीमुळे यंत्रणेवर ताण, सायन प्रतीक्षानगर येथील रहिवाशांना सातत्याने बत्ती गुल होण्याच्या घटनांचा सामना करावा लागत आहे.

बत्ती गुलमुळे मुंबईकर घामाघूम, ‘बेस्ट’च्या ग्राहकांना फटका; आठवडाभर विजेचा लपंडाव सुरू
मुंबई - राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत वीजपुरवठा कधीही खंडित होत नाही. मात्र, सध्याच्या वाढत्या उन्हाळ्यात वातानुकूलन यंत्रणा (एसी), कुलर, पंखे यांच्या वाढत्या वापरामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे विजेची उपकरणेही गरम होत आहेत. त्याचा दुहेरी परिणाम म्हणून मुंबई शहरातील ट्रिपिंगच्या घटना वाढल्याने वीज खंडित होण्याच्या घटना वाढल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत.
‘बेस्ट’च्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ट्रिपिंग झाल्याने वरळीसह लगतच्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. तो सुरळीत होण्यास ४:३० वाजले. याच वेळेत भोईवाडा येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या आठवड्यात दादर, माहीम येथील ‘बेस्ट’ ग्राहकांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची झोप मोड झाली. सायन प्रतीक्षानगर येथील रहिवाशांना सातत्याने बत्ती गुल होण्याच्या घटनांचा सामना करावा लागत आहे.
गेला आठवडाभर खेळ
‘बेस्ट’च्या ग्राहकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवडाभरात सायन प्रतीक्षानगर, गिरगाव, वरळी, भोईवाड्यात वीजपुरवठा खंडित झाला. ऐन उकाड्यात दुपारी किंवा रात्री सव्वा ते दीड तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या त्रासात भरच पडत आहे.
वीजपुरवठा खंडित का झाला?
वाढत्या वातावरणीय तापमानाचा थेट परिणाम
वीजपुरवठा यंत्रणेवर होतो.
केबल आणि विविध विद्युत उपकरणांवर ताण येतो.
लोडमुळे काही ठिकाणी केबल गरम होणे, उपकरणांचे बिघाड होणे, वीजपुरवठ्यात खंड पडणे अशा समस्या उद्भवत आहेत.
विजेची सर्वाधिक मागणी दुपारी २ ते ३ या वेळेत असते. उन्हाळ्यात एसी, कुलर आणि पंखे वेगाने फिरतात. अशावेळी विजेची मागणी वाढते. त्यानुसार विजेचा पुरवठा होतो. मात्र, वाढती उष्णता, वीज यंत्रणावर येणारा ताण, अशा विविध कारणांमुळे ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड होतात. ट्रिपिंग होते. अशावेळी ट्रान्सफाॅर्मरची संख्या वाढविणे अपेक्षित असते किंवा ट्रान्सफाॅर्मरचा लोड शिफ्ट करणे आवश्यक असते. वीज यंत्रणांनी याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
अशोक पेंडसे, वीज तज्ज्ञ