Nala Sopara: दारूच्या नशेत घेतला मित्राचा जीव, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:45 IST2026-03-25T19:44:07+5:302026-03-25T19:45:31+5:30
नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील परिसरातील एका चाळीत मद्यप्राशन केल्यानंतर झालेल्या क्षुल्लक वादातून एका ३० वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nala Sopara: दारूच्या नशेत घेतला मित्राचा जीव, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?
नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील परिसरातील एका चाळीत मद्यप्राशन केल्यानंतर झालेल्या क्षुल्लक वादातून एका ३० वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
शुभम तिवारी (वय, ३०), पिंटू ठाकूर (वय, ४०) आणि हरिश्चंद्र बिंद (वय, ३१) हे तिघेही नालासोपारा पूर्व येथील पवन निवास चाळीतील एका खोलीत भाड्याने राहत होते. हे तिघेही व्यवसायाने पेंटर असून मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी होते. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे हे तिघेही काम संपवून घरी परतले. यावेळी तिघांनीही मद्यप्राशन केले होते. रात्री साडे आठच्या सुमारास त्यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून वादावादी सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी पिंटू ठाकूर याने रागाच्या भरात घरात असलेल्या धारदार शस्त्राने शुभम तिवारी याच्या डोक्यावर आणि छातीच्या डाव्या बाजूला सपासप वार केले.
या जीवघेण्या हल्ल्यानंतर शुभम रक्ताळलेल्या अवस्थेत खोलीच्या बाहेर आला. "ठाकूरने मला मारले," असे ओरडत तो घरासमोरील पॅसेजमध्ये कोसळला. शुभमचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारा १९ वर्षीय तरुण आकाश शर्मा आणि त्याचे वडील तातडीने मदतीला धावले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला तातडीने रिक्षाने जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शुभमची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्रत्यक्षदर्शी आकाश शर्मा याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी पिंटू ठाकूर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर आरोपीने परिसरातून पळ काढला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. भरवस्तीत आणि मित्रांमध्येच झालेल्या या रक्तरंजित घटनेमुळे नालासोपाऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.