Maharashtra Election 2019: तिथं हिरव्याला गाडा म्हणतात अन् इथं... ; आव्हाडांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 22:14 IST2019-10-16T22:12:26+5:302019-10-16T22:14:20+5:30
Maharashtra Election 2019: औरंगाबाद येथे जाऊन हिरव्यांना गाडा असं म्हणतायेत आणि मुंब्रा कळव्यात येऊन

Maharashtra Election 2019: तिथं हिरव्याला गाडा म्हणतात अन् इथं... ; आव्हाडांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा-कळवा मतदारसंघात आपल्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना, भाजपा-शिवसेनेचे हस्तक मला संपवून टाकण्यासाठी बंदुक घेऊन फिरत आहेत. जितेंद्र आव्हाडचीही किंमत लावली होती. जितेंद्र आव्हाड सगळं विकेल, जितेंद्र आव्हाड आपलं इमान आणि स्वाभिमान कधीही विकणार नाही, असे आव्हाड यांनी म्हटले. आपल्या सभेत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली.
औरंगाबाद येथे जाऊन हिरव्यांना गाडा असं म्हणतायेत आणि मुंब्रा कळव्यात येऊन धनुष्यबाणाचा तीर मारा, असे उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेत आहेत. माझ्या मतदारसंघात शिवसेना आणि एमआयएमची छुपी युती असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. माझ्या घराबाहेर 4 जण उभे होते, मला ठार मारण्यासाठी. गौरी लंकेश यांना ज्यांनी जीवे मारलं, तेच ते लोकं होते. पण, माझ्या मृत्युची तारीख परमेश्वरच ठरवेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. आव्हाड यांनी मोदी सरकारवरही टीका केली. सकाळ-संध्याकाळ मोदी फक्त पाकिस्तान-पाकिस्तान एवढंच करतात. पण, पाकिस्तानकडून तेच साखर मागवितात, तेच पाकिस्तानकडून कांदा मागवतात. हम बेवफा हरगीस न थे, पर वफा कर ना सके... असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना टोला लगावला.
दरम्यान, आव्हाड यांनी देशातील अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना, तरुणांचा रोजगार गायब होत आहे. पारले जी कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचंही आव्हाड यांनी म्हटले.