एकनाथ शिंदे अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री झाले; पण, महाराष्ट्रात 'पिक्चर अभी बाकी है..!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 20:58 IST2024-12-05T20:58:15+5:302024-12-05T20:58:47+5:30
विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर आज अखेर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.

एकनाथ शिंदे अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री झाले; पण, महाराष्ट्रात 'पिक्चर अभी बाकी है..!'
Eknath Shinde DCM : विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज (5 डिसेंबर) अखेर मोठ्या थाटामाटात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उफमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील होण्याबाबत मोठा सस्पेन्स होता. पण, शेवटच्या क्षणी त्यांनी सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयारी दर्शवली.
महायुतीत मंत्रिपदांवरुन रस्सीखेच
दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असली तरी, पुढील वाच वर्षे हे सरकार टीकवण्याची मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर असणार आहे. फडणवीसांचा यापूर्वीचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ खूप संघर्षाचा राहिला आहे, त्यामुळे त्यांचा येणारा काळही त्यांच्यासाठी मोठ्या संघर्षाचा असण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, बाहेरील संघर्षासोबतच त्यांना अंतर्गत संघर्षाचाही सामना करावा लागणार आहे. याचे कारण म्हणजे, मुख्यमंत्रीद न मिळाल्यामुळे आता शिंदेंचा डोळा महत्वाच्या खात्यांवर असणार आहे.
महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला, पण अद्याप खाटेवाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. मुंबईमध्ये खातेवाटवार अंतिम निर्णय न झाल्यास, पुन्हा दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गृहमंत्रालयासाठी आग्रही आहेत, पण भाजप ते सोडायला तयार नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते, त्यामुळे आता शिंदे उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना गृहखाते मिळावे.
अजित पवारांच्या काही खात्यांवर शिंदेंचा डोळा?
अजित पवार यांनीही राष्ट्रवादीसाठी मोठ्या मंत्रिपदांची मागणी केली आहे. याबाबतही लवकरच काळात निर्णय घ्यावा लागणार आहे. शिंदे गट अजित पवारांच्या काही खात्यांवर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार, दोघांनाही नाराज करुन चालणार नाही. शिवाय, भाजपचे आमदारही मोठ्या मंत्रिपदावर आस लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत, भाजपला शिंदे-पवारांसोबत पक्षातील नेत्यांचीही मर्जी सांभाळावी लागणार आहे.