“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:05 IST2025-06-24T17:01:33+5:302025-06-24T17:05:47+5:30
CM Devendra Fadnavis Replied Rahul Gandhi Allegations: तुमच्याच लोकांशी एकदा बोलला असता, तर किमान काँग्रेसमधील विसंवाद इतक्या वाईटपणे समोर आला नसता, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना लगावला आहे.

“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
CM Devendra Fadnavis Replied Rahul Gandhi Allegations: विधानसभा निवडणूक होऊन आता अनेक महिने लोटले तरी, काँग्रेससह विरोधी पक्षाचे निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचे दावे अद्यापही करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदारांबाबत आरोप केले. या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सगळी आकडेवारी मांडत प्रत्युत्तर दिले. हे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना उद्देशून टोलेबाजीही केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट करत राहुल गांधी यांचे दावे तसेच आरोपांना उत्तर दिले आहे. ‘झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…’ राहुल गांधी, महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवाचे तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे, हे मी समजू शकतो. पण तुम्ही कधीपर्यंत हवेतच बाण मारत राहणार आहात? तुमच्या माहितीसाठी सांगतो की, महाराष्ट्रात असे २५ हून अधिक मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांची संख्या ८ टक्क्यांपेक्षा जास्तने वाढली आहे आणि त्यातील अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमधील संवादाचा अभाव इतका वाईटरित्या प्रदर्शित झाला नसता
आपल्या एक्स पोस्टमध्ये पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, माझ्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात मतदारांच्या संख्येत ७ टक्क्यांनी (२७,०६५) वाढ झाली आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी तेथे निवडणूक जिंकली. उत्तर नागपुरात ७ टक्के (२९,३४८) मतदार वाढले आणि काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले. पुणे जिल्ह्यात वडगाव शेरीमध्ये १० टक्के (५०,९११) मतदार वाढले आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बापूसाहेब पाठारे विजयी झाले. मालाड पश्चिममध्ये ११ टक्के (३८,६२५) मतदारांची वाढ झाली आणि तुमच्या काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख विजयी झाले. मुंब्रामध्ये ९ टक्के (४६,०४१) मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले. मित्रपक्षांकडून नाही तरी, पण हे ट्विट करण्यापूर्वी तुम्ही तुमच्याच पक्षातील जुने सहकारी असलेले अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांच्याशी एकदा बोलले असते तर बरे झाले असते. किमान काँग्रेसमधील संवादाचा अभाव इतका वाईटरित्या प्रदर्शित झाला नसता, असे टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
नेमके काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी आता असा दावा केला आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मतदानाच्या आधी शेवटच्या पाच महिन्यांत अचानक आठ टक्के मतदार वाढले. मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक २० ते ५० टक्के मतदार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची तक्रार केली असून, ज्यांच्या पत्त्यांची पडताळणी झालेली नाही, असे हजारो मतदार प्रसारमाध्यमांनी शोधून काढले आहेत. या सगळ्यावर निवडणूक आयोग मौन बाळगून आहे. निवडणूक आयोग या घोटाळ्यात सहभागी आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. असे अनेक घोळ समोर येत आहेत. ही एक प्रकारची मतांची चोरी आहे. मात्र निवडणूक आयोग व सरकार हे सगळं झाकण्याचा प्रयत्न करत आहे. हीच त्यांची कबुली नव्हे का? म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार याद्या आणि मतदानाचं सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत, असे राहुल गांधी यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.