Kolhapur: हत्तींच्या वावरामुळे चंदगडच्या शेतकऱ्यांच्या जिवाला घोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:36 IST2025-05-28T19:35:33+5:302025-05-28T19:36:36+5:30

शेतीच नको, अशी म्हणण्याची वेळ 

The lives of chandgad farmers are in danger due to the movement of elephants. | Kolhapur: हत्तींच्या वावरामुळे चंदगडच्या शेतकऱ्यांच्या जिवाला घोर

संग्रहित छाया

निंगाप्पा बोकडे

चंदगड : सिंधुदुर्ग जिल्हा, कर्नाटक हद्दीत व पुढे अनेक गावांचा प्रवास करत २५ वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात पोहोचलेल्या हत्तीने अलीकडील काही वर्षांत आपला मोर्चा पूर्व भागाकडेही वळविला आहे. शेतीसह वाहनांवर थेट हल्ले यात पाचजणांना जीव गमवावा लागल्याने शेतकरी पुरता घाबरला असून त्याच्यापासून आपल्या शेतीचे संरक्षण करताना तो मेटाकुटीला आल्यामुळे ती शेतीच नको, अशी म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

सुगीच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरंगे जंगलात असलेले हत्ती कर्नाटक हद्दीतील जंगलातून दरवर्षी कणकुंबी-ओलमणी या गावाचा प्रवास करत खानापूर तालुक्यातील जांभेगाळी-देवराई गावाजवळील जंगलातून चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात येत आहेत. त्यांनी हाजगोळी, कळसगादे, पाटणे, जेलुगडे, कलिवडे, हेरे, खामदळे, कानूर, पिळणी भागात नुकसान चालविले आहे.

आता तर या हत्तीने आपला मोर्चा पूर्व भागाकडे वळवत चिंचणे, कामेवाडी, होसूर, कर्नाटक हद्दीतील बेकिनकरे, अतिवाड या गावात धुडगूस घातला आहे. तालुक्यातील पश्चिम भागात ऊस, केळी, रताळी या पिकांवर ताव मारायला मिळत असल्याने त्याने आपला मोर्चा या भागात कायम ठेवला आहे. त्यानंतर पूर्वभागातील ऊस, केळी व इतर खाद्यही त्याला गोड लागल्याने त्याने आपला मुक्काम तिकडेही वाढविला आहे, पण अलीकडे त्याने शिवारातील धुडगूससोबत वाहनांवर हल्ले, बैलगाडी, ट्रॅक्टरचे नुकसान चालविले आहे. त्याचा आक्रमकपणा वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

पाटणे व चंदगड वनविभागाकडून वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जातात, पण हत्ती, गवे, रानडुक्कर व इतर प्राण्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, पंचनामा करण्यापलीकडे त्यांच्याकडे प्रभावी उपाययोजना नाही.

खाद्याची सोय जंगलात करण्याची मोहीम

तालुक्यात जंगलात सर्व प्रकारचे वन्यप्राणी जंगलात आहेत. त्यांच्या खाद्याची सोय जंगलात होत नसल्याने त्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे तो कमी करण्यासाठी वनविभागाकडून त्यांच्या खाद्याची सोय जंगलात करण्याची मोहीम सुरू केली आहे. येत्या काही वर्षांत त्यामध्ये यशस्वीही होऊ, पण त्याला थोडा वेळ लागणार असल्याचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी सांगितले.

हत्तींवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

हत्तींवर नियंत्रण करण्यासाठी ट्रंक काॅल द वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून आनंद शिंदे यांचे तालुक्यात काम सुरू होते. त्याचे चांगले परिणाम दिसून येत होते. अजून काही वर्षे त्यांना संधी दिली असती तर अजून खूप चांगले परिणाम पाहावयास मिळाले असते, पण शासनाने त्यांचा करार पुढे चालू न ठेवल्याने त्यांनी काम थांबविले आहे. त्यामुळे हत्तींवर नियंत्रण मिळवायचे झाल्यास या संस्थेला आणखी काही वर्षे संधी देणे गरजेचे आहे.

Web Title: The lives of chandgad farmers are in danger due to the movement of elephants.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.