Kolhapur Municipal Election Results 2026: काँग्रेस सत्तेला हुकली; महायुती एकजुटीने जिंकली, निकालानंतरचे विश्लेषण..वाचा सविस्तर
By विश्वास पाटील | Updated: January 17, 2026 15:41 IST2026-01-17T15:40:48+5:302026-01-17T15:41:13+5:30
काँग्रेसचे काय चुकले..?, महायुतीला कशाचा फायदा झाला..?...जाणून घ्या

Kolhapur Municipal Election Results 2026: काँग्रेस सत्तेला हुकली; महायुती एकजुटीने जिंकली, निकालानंतरचे विश्लेषण..वाचा सविस्तर
विश्वास पाटील
कोल्हापूर : सर्वांना बरोबर घेताना काही ठिकाणी चुकलेले निर्णय, एकाच कुटुंबात दिलेल्या दोन उमेदवारी, हुकमी शिलेदार पराभूत अशा काही कारणांमुळे चांगली लढत देऊनही काँग्रेसकोल्हापूर महापालिकेत सत्तेपर्यंत पोहोचू शकला नाही. याउलट महायुतीत बेबनाव जरूर होता, परंतू सत्तेची ताकद मोठी असल्याने त्यांनी सत्ता खेचून घेण्यात यश मिळवले.
काँग्रेसचे काय चुकले..?
१. काँग्रेसने प्रभाग १० मधून अक्षय जरग यांची उमेदवारी निश्चित झाली होती. परंतु, उध्दवसेनेला सोबत घेताना त्यांच्यावर अन्याय झाला. जरग यांची बंडखोरी रोखणे व त्यांना पूर्ववत सोबत घेण्यात यश न आल्याने त्याचा दोन जागांना फटका बसला.
२. काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक ११ मधून मावळा ग्रुपचे उमेश पोवार इच्छुक होते, त्यांचे सामाजिक काम, प्रतिमा चांगली होती. त्यामुळे त्यांना काँग्रेसने काम करण्यास सांगितले होते. त्यांना अपक्ष लढून २५८२ मते मिळाली. या प्रभागात तालमीचे पाठबळ मिळावे यासाठी पाटाकडील तालमीचे संदीप सरनाईक यांना रिंगणात उतरवले; परंतु या प्रभागातून काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा आली.
३. काँग्रेसची ज्यांच्यावर भिस्त होती असे मधुकर रामाणे, भूपाल शेटे, राहुल माने, दीपा मगदूम, राजू दिंडोर्ले, सरोज सरनाईक या उमेदवारांचा पराभव झाला.
४. ‘माझ्यापुरते एक मत’ असा प्रचार करायचा नाही असे नेत्यांनी बजावून सांगूनही क्रॉस व्होटिंगचा फटका काँग्रेसला अनेक ठिकाणी बसला.
५. उध्दवसेनेने सहा जागा लढवल्या होत्या, त्यांना तीन जागा जिंकून येण्याची अपेक्षा होती. मात्र, तिथेही वजावटच झाली.
महायुतीला कशाचा फायदा झाला..?
१. महायुतीत भाजपचाच सक्सेस रेट सर्वाधिक राहिला. मूळ उमेदवारी देतानाही भाजपने ताकद लावून सर्वाधिक ३६ जागा घेतल्या. त्यांच्या गेल्या सभागृहात १४, तर ताराराणीच्या १९ अशा ३३ जागा होत्या. यावेळेला एकाच चिन्हावर लढून त्यांनी २६ जागा जिंकल्या. पक्षाबद्दल मध्यमवर्गीय मतदार, तरुणाई आणि हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांमध्ये वाढलेला बेस हे त्याचे कारण आहे.
२. भाजपने मुंबईत एक सदस्यीय निवडणूक घेतली; परंतु राज्यात अन्य महापालिकांमध्ये त्यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब केला. त्याचा फायदा भाजपला झाला. जिथे भाजपचे कमिटेड मतदान होते, त्याचा त्या प्रभागात जागा जिंकण्यात उपयोग झाला.
३. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव यांनी सूक्ष्म नियोजन केले. उमेदवारांना ताकद दिल्याने पक्ष एकजुटीने लढला. उमेदवारही ताकदीचे आणि स्वच्छ प्रतिमेचे दिले याचा फायदा झाला.
४. आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदेसेनेचाच महापौर करायचा हे मोठे टार्गेट घेऊनच मैदानात उतरले. मधल्या काळात सत्यजित कदम, शारंगधर देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांचे पक्षात इनकमिंग झाले. त्यामुळे त्यांनी ३० जागा पदरात पाडून घेतल्या. त्यातील १५ जिंकण्यात त्यांना यश मिळाले. महायुतीची सत्ता आणण्यात या जागांचे पाठबळ मोठे आहे.
३. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यापूर्वी कधीच कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत उतरले नव्हते. परंतु यावेळेला त्यांनी कोल्हापुरात तळ ठोकला. शिंदेसेनेच्या प्रचाराचीच नव्हे तर इतर सर्वच जोडण्यांची जबाबदार खांद्यावर घेतली. त्यामुळेच शिंदेसेनेला हे यश मिळू शकले.
४. या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मुळातच १४ जागा वाटणीला आल्या. महायुतीत अन्य दोन घटक पक्षांनी घेऊन शिल्लक राहिलेल्या जागा राष्ट्रवादीला दिल्या. त्यामुळे त्यांचा विजयाचा रेट घसरला. या पक्षाला कशाबशा चारच जागांवर यश मिळाले. परंतु, सत्तेचा लंबक ठरवण्यात या जागा फारच निर्णायक ठरल्या आहेत.
५. महायुती होताना मुख्यत: भाजप-शिंदेसेनेत नाराजी जास्त झाली. त्यातील अनेक उमेदवार जनसुराज्यकडे गेले. त्याचा फायदा काँग्रेसला होणार नाही याची दक्षता घेतली. जनसुराज्यचा एक उमेदवार विजयी झाला, त्याचे बळही महायुतीसोबतच असेल.