कोल्हापूरच्या महापौरपदासाठी महायुतीत जोडण्या सुरु; कुणाची नावे चर्चेत, कोण बाजी मारणार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:35 IST2026-01-22T18:33:33+5:302026-01-22T18:35:06+5:30
शिंदेसेनेच्या संमतीलाही असेल तितकेच महत्व

कोल्हापूरच्या महापौरपदासाठी महायुतीत जोडण्या सुरु; कुणाची नावे चर्चेत, कोण बाजी मारणार.. जाणून घ्या
कोल्हापूर : कोल्हापूरचेमहापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झाल्याने गुरुवारी दुपारपासूनच या पदासाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली. महापालिकेत महायुतीचे बहुमत आहे आणि सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याने याच पक्षाला हे पद मिळणार आहे. या पक्षातून मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला संधी द्यायची म्हटल्यास विजयसिंह खाडे हे नाव पुढे येऊ शकते.
ही संधी कुणाला द्यायची यामध्ये एकटा भाजप निर्णय घेऊ शकत नाही. त्यामध्ये शिंदेसेनेची भूमिकाही महत्त्वाची आहे. कारण त्यांचे १५ सदस्य आहेत आणि त्यांना सोबत घेतल्याशिवाय बहुमत होत नाही. परिणामी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या संमतीला महत्त्व राहील.
महापालिकेत ८१ सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे ४५ नगरसेवकांचे बहुमत आहे. शिंदेसेनेने आपलाच महापौर असा दावा केला असला तरी नगरसेवकांची संख्या भाजपकडे जास्त आहे. त्यांच्याकडे या सभागृहात विशाल शिराळे, विजयसिंह देसाई, प्रदीप देसाई, वैभव कुंभार, रेखा उगवे आणि सुरेखा ओटावकर असे सहा नगरसेवक ओबीसीमधून निवडून आलेले आहेत. रूपाराणी निकम या खुल्या मतदार संघातून निवडून आल्या तरी त्यांचा ओबीसीचा दाखला आहे. दहा वर्षानंतर पुरुषांना महापौर होण्याची संधी मिळत असल्याने महिला नगरसेवकांचा विचार होण्याची शक्यता नाही.
त्यामुळे चार नावे शिल्लक राहतात. त्यातील विशाल शिराळे यांच्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आग्रह धरला जाऊ शकतो. कारण विशाल यांचे वडील किरण शिराळे हे मूळ ताराराणीचे कार्यकर्ते आणि महाडिक प्रेमी आहेत. विजयसिंह देसाई आणि प्रदीप देसाई हे दोघेही नवीन नेतृत्व आहे. विजयसिंह हे रिंग रोड परिसरातून विजयी झाले आहेत. प्रमोद देसाई हे रुईकर कॉलनी परिसरातून विजयी झाले आहेत. त्यांची भाजपमधील वाटचाल अलीकडील काही महिन्यातील आहे. वैभव कुंभार यांच्या आई या भाजपच्या नगरसेविका होत्या.
महत्त्वाचे काय..?
महापौरपद देताना मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला देणार की नंतर पक्षात आलेल्यांना देणार हा कळीचा मुद्दा आहे. आता स्पष्ट बहुमत आहे तर किमान पक्षासाठी राबलेल्या कार्यकर्त्यालाच ही संधी दिली जावी, असा दबाव पक्षातून वाढला जाऊ शकतो. उमेदवारी देताना कार्यकर्त्यांचा बळी दिला जात आहे तर किमान निवडून आल्यावर तरी संधी देऊन चांगला मेसेज समाजात दिला जावा यासाठी भाजपमधून प्रयत्न होऊ शकतो.
मंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्त्वाची...
महापौर निवडीत मंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. ते खासदार धनजंय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव यांच्याशी चर्चा करून उमेदवार निश्चित करतील. विजयसिंह खाडे हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. विशेष म्हणजे मंत्री पाटील जिथे राहतात त्या प्रभागाचे ते प्रतिनिधित्व करतात. २५ ला रविवारी मंत्री पाटील कोल्हापुरात येणार आहेत. त्यादिवशी यासंदर्भातील घडामोडी होतील, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
अंतिम निर्णय राज्यस्तरावरच
भाजपच्या राज्यस्तरीय धोरणानुसार एका पदासाठी तीन नावे प्रदेशकडे पाठवली जाणार आहेत. त्यातील कुणाला संधी द्यायचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समितीकडून घेतला जाणार आहे. म्हणजे शहर पातळीवर कुणी कितीही फिल्डिंग लावली तरी अंतिम निर्णय राज्यस्तरावरच होणार आहे.
सर्वांना बरोबर घेऊन जाणारा..
कोल्हापूर महापालिकेत विरोधात काँग्रेस-उद्धवसेना आहे. त्यांचे संख्याबळ ३५ आहे. त्यामुळे विरोधक ताकदवान आहे. अशा स्थितीत महायुतीतील सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि त्याचवेळेला विरोधकांनाही तितक्याच ताकदीने सामोरे जाणारा नगरसेवक हवा असाही विचार होऊ शकतो. कोल्हापूर उत्तर की दक्षिण विधानसभा मतदार संघाला संधी देणार हा देखील निकष आहेच.
भाजप वाढवण्यासाठी राबलेल्या कार्यकर्त्याला ही संधी दिली जावी, अशी पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. सगळी पदे, उमेदवाऱ्या, सत्तेची संधी पैसेवाल्यांनाच दिली जाऊ नये या मताचे आम्ही आहोत. - महेश जाधव, प्रदेश सचिव भाजप महाराष्ट्र