Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचा विचार बुलंद करण्यासाठी सतेज पाटील यांना बळ द्या - हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:28 IST2026-01-13T12:25:58+5:302026-01-13T12:28:33+5:30
कसबा बावड्यातील सभेला उदंड प्रतिसाद

छाया: नसीर अत्तार
कोल्हापूर-कसबा बावडा : ईडीसह सगळ्या भीती दाखवूनही आमदार सतेज पाटील तसूभरही काँग्रेसच्या विचारांपासून हटले नाहीत. काँग्रेसचा विचार त्यांच्या नसानसांत भिनला आहे. थेट पाईपलाइनचे पाणी आणणारा हा पाणीदार नेता पुढल्या काळात महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. अशा नेतृत्वाला कोल्हापूरकरांनी बळ देऊन काँग्रेसचा विचार बुलंद करावा अशी साद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी कोल्हापूरकरांना घातली.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व उद्धवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कसबा बावड्यातील भाजी मंडई परिसरात झालेल्या विराट सभेत सपकाळ बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, उदय नारकर, दिलीप पवार प्रमख,आनंद माने, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सतेज पाटील यांच्यामध्ये काम करण्याची प्रचंड क्षमता आहे. थेट पाईपलाईनच्या माध्यमातून या नेत्याने पाणी दिले. हेच पाणी अडवण्याचे काम येथील एका माजी महसूलमंत्री अन् विद्यमान मंत्र्याने केले आहे. तहानलेल्या माणसांना पाणी देण्याची आपली संस्कृती असताना पाणी अडवणारी टोळी कोल्हापुरात आहे हेच दुर्दैवी आहे. त्यामुळे पाणी अडवणाऱ्या अन् तोडपाणी करणाऱ्यांना कोल्हापूरकरांनी आडवावे.
बावडेकर असल्याचा अभिमान
माझ्या गावाने मला नेहमीच बळ दिले आहे. राधेय स्पोर्टच्या कट्ट्यावर बसून राजकारणाचे धडे घेतले. त्या काळामध्ये अगदी रस्त्यावर फिरून हजार हजार रुपये गोळा करून हनुमान मंदिर बांधण्याचे कामही माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांने केले आहे. सर्व निवडणुकांमध्ये माझे गाव पूर्ण ताकदीने माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी मी बावड्याचा आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो या शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी बावडेकरांचे आभार मानले.
माझ्या धास्तीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोल्हापुरात आले
भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर लोकांचा विश्वास नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले तर थोडी फार मते मिळतील म्हणून ते कोल्हापुरात आले पण येथे कुणीही आले तरी बंटी पाटील एकदा मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही हा इतिहास आहे, या शब्दांत सतेज पाटील यांनी महापालिकेचे मैदान मारणारच, असा ठाम दावा केला.
विरोधकांना आम्ही दिलेला रोजगार दिसत नाही
डॉ .संजय डी पाटील म्हणाले, कोणतीही निवडणूक आली की विरोधक डी. वाय. पाटील कॉलेजबद्दल, सयाजी हॉटेल आणि हॉस्पिटलबद्दल बोलतात. पण आमच्यावर आरोप करताना या लोकांनी राजकारण वेगळं ठेवायला पाहिजे होते. आज हॉस्पिटल, हॉटेल आणि कॉलेजच्या माध्यमातून हजारो लोकांना नोकरी देऊ शकलो. रोजगार उपलब्ध झाले. हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो लोकांवर मोफत उपचार होत आहेत. हे सामाजिक काम विरोधकांना दिसत नाही का.? मी माझ्याकडून जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं करत आलो आहे. लोकांची सेवा करत आहे. बावडा आमच्या नेहमीच पाठीशी आहे. त्यामुळे काँग्रेस-उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले.
आमच्याकडे जनतेची फौज
ऋतुराज पाटील म्हणाले, विरोधकांकडे नेत्यांची फौज आहे. रोज एक मंत्री कोल्हापुरात येत आहेत. मात्र, बंटी पाटलांकडे जनतेची फौज आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. काँग्रेस पक्षाकडून नुकताच कोल्हापूरच्या विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे आणि त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. इतिहास घडवण्याचे काम आपण पक्षाच्यावतीने पुढील काळातही करणार आहोत. काही झालं तरी येत्या निवडणुकीत गुलाल आपलाच आहे असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
जाहीरनाम्यातील वचने पूर्ण करु
शाहू छत्रपती म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आपल्याच बाजूने असणार आहे. जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण केली जातील. केएमटीच्या वतीने चांगली सेवा देण्याचे काम केले जाईल.
संजय पवार म्हणाले, डी. वाय. पाटील ग्रुपने या कोल्हापूरकरांसाठी जे दिले आहे त्याची बरोबरी कुणीच करू शकणार नाही. शहरातील खड्ड्यांमुळे कोल्हापूरकरांचे कंबरडे मोडले आहे त्याची जबाबदारी महायुतीने घ्यावी.
पाटील यांना अडवण्यासाठी भाजपकडून सत्तेचा खेळ
सतेज पाटील हे अत्यंत अभ्यासू आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची त्यांच्या धमक आहे. पण ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होऊ नयेत,म्हणून भाजपने कारस्थान रचले. काँग्रेसचे राजीव सातव यांच्या पत्नीला विधानपरिषदेचा राजीनामा द्यायला लावला. आमदार पाटील यांच्यासारख्या स्वाभिमानी नेतृत्वाला अडवण्यासाठी भाजपने सत्तेचा खेळ केला,अशी टीकाही सपकाळ यांनी केली.