Kolhapur: शेताकडे जाताना दबा धरुन बसलेल्या गव्याचा हल्ला, शेतकरी जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:47 IST2025-06-09T15:47:11+5:302025-06-09T15:47:40+5:30
जिल्ह्यात गव्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या

Kolhapur: शेताकडे जाताना दबा धरुन बसलेल्या गव्याचा हल्ला, शेतकरी जागीच ठार
धामोड : कुदळवाडी येथील शेतकरी भिकाजी गुंडू बेरकळ हे शेताकडे गेले असता दबा धरून बसलेल्या गव्याने जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. ही धडक इतकी जोराची होती की अवघ्या काही मिनिटातच उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.८) घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मुक्तदेह पुढे पाठवला.
आपटाळ पैकी कुदळवाडी (ता राधानगरी) येथील भिकाजी गुंडू बेरकळ (वय ६५) हे शेतीच्या कामासाठी व पिकांना पाणी देण्यासाठी आपल्या शेताकडे चालले होते. दरम्यान कडक नावाच्या शेताजवळ येताच, या ठिकाणी दबा धरून बसलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. गव्याने दिलेली धडक इतकी जोरदार होती की, गव्याची शिंगे त्यांच्या उजव्या बाजूच्या बरगडीत घुसली. छातीवर जोरदार धडक बसल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. व अवघ्या काही मिनिटातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वाचा- भिकूआबा, आम्हासनी आता पाणी आल्याचे कोण सांगणार
घटनेची फिर्याद गावचे पोलीस पाटील बाळासो पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाणे व वनविभाग राधानगरी यांना दिली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, राधानगरीकडे पाठविला.
मृतांची संख्या सर्वाधिक
जिल्ह्यात गव्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. गव्यांनी काही ठिकाणी शेतकरी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे, ज्यात काहीजण जखमी झाले आहेत तर काहीजणांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात गत तीन वर्षांत झालेल्या हल्ल्यांमध्ये गव्यांच्या हल्ल्यातील मृतांची संख्या ७ झाली आहे.
गव्यांच्या हल्ल्यातील मृत्यू
- २०१९-२० : ३
- २०२१-२२ : २
- २०२३-२४ : १
- २०२४-२५ : १
तळगाव, आपटाळ, कुदळवाडी हा परिसर जंगलहद्दीला लागून येत असल्याने वन्यप्राण्यांपासून लोकांना होणारा त्रास या गावातील नवीन नाही. तरीही ग्रामस्थांनी काळजी घेऊन शिवारात जावे - संग्राम जितकर, वनपाल म्हासुर्ली
शासन नियमाप्रमाणे मिळणारा मोबदला सदर पिडीत कुटुंबीयां पर्यंत लवकरात लवकर पोहचवण्यासाठी योग्य ते सहकार्य करू - विशाल पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी राधानगरी )