केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर; चोपडा येथील सभेत शरद पवार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2024 17:10 IST2024-05-03T17:06:37+5:302024-05-03T17:10:01+5:30
केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी चोपडा येथे आयोजित सभेत केली.

केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर; चोपडा येथील सभेत शरद पवार यांची टीका
श्यामकांत जाधव,चोपडा (जि. जळगाव) : गेल्या दहा वर्षात इंधनाचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. शेती मालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देवू म्हणणारे आज त्या विषयावर बोलत नाहीत. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. मात्र केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी चोपडा येथे आयोजित सभेत केली.
चोपडा येथे शुक्रवारी दुपारी जाहीर सभा झाली. त्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, हमीभाव मिळावा म्हणून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. वर्षभर ते आंदोलन चालले. मात्र तिथं जायला सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. उलट शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या गेल्या, आंदोलनात ७०० शेतकऱ्यांनी आपले जीव गमावले पण सरकारला काहीही फरक पडला नाही. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अशी अवस्था ही देशासाठी चांगली बाब नक्कीच नसल्याचे ते म्हणाले.
चोपडा येथील सभेची वेळ सकाळी १० : ३० वाजेची होती. प्रत्यक्षात १ : ३० वाजता शरद पवार हे सभास्थळी पोचले. त्यामुळे सुमारे तीन तास कार्यकर्ते, पदाधिकारी भर उन्हात ताटकळत होते.