मे महिन्यातील पावसाने गोंदियातील ५५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:18 IST2025-06-03T19:17:23+5:302025-06-03T19:18:02+5:30

१२६० शेतकरी बाधित : सडक अर्जुनी, गोंदिया तालुक्यात सर्वाधिक नुकसान

May rains damage crops on 550 hectares in Gondia | मे महिन्यातील पावसाने गोंदियातील ५५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

May rains damage crops on 550 hectares in Gondia

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
जिल्ह्यात मे महिन्यात तीन-चार वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ५५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणातून पुढे आली आहे. तर याचा अंतिम अहवाल तयार व्हायचा असून, या नुकसानीच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यात रब्बी हंगामात ४६ हजार हेक्टरवर धान, तर ४ हजार हेक्टरवर मका मकाची लागवड करण्यात आली. भाजीपाल्याची सुध्दा तीन ते चार हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. मात्र यंदा एप्रिल आणि मे महिन्यात पावसाने तीन-चार वेळा हजेरी लावली. ऐन धानाची कापणी, मळणी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात धान आणि मका पिकाचे नुकसान झाले. परिणामी तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.


जिल्ह्यात १ ते ५ मेदरम्यान झालेल्या पावसामुळे ५५ गावांतील १४२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याने ४४३ शेतकरी बाधित झाले. तर २० ते २५ मेदरम्यान झालेल्या पावसाने ३७१.७१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याने ८१९ शेतकरी बाधित झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. या पंचनाम्यांचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान
मे महिन्यात झालेल्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील नुकसानीचा आकडा अद्याप पंचनाम्यांचा अहवाल तयार झाला नसल्याने पुढे आला नाही. नजर अंदाज सर्वेक्षणात शेकडो हेक्टरमधील रब्बी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.


दोन महिन्यांतील नुकसानीचा आकडा जाणार ६ हजार हेक्टरवर

  • एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धानासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
  • या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण 3 झाले आहे. नुकसानीचा अंतिम आकडा आठवडाभरात निश्चित होऊन त्यानंतर हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. नुकसानीचा आकडा ६ हजार हेक्टरवर असल्याचे कृषी विभागाच्या यंत्रणेने सांगितले.
  • शासनाने हेक्टरी किती नुकसान भरपाई जाहीर करते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: May rains damage crops on 550 hectares in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.