अक्षय्यतृतीयेला बालविवाह करणाऱ्यांवर थेट कारवाई; महिला व बालविकास विभाग सतर्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:41 IST2025-04-28T16:40:03+5:302025-04-28T16:41:09+5:30
Gondia : महिला व बालविकास विभाग अलर्ट मोडवर

Direct action against those who marry children on Akshaya Tritiya; Women and Child Development Department alert!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाह पार पडतात. हे बालविवाह लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग अॅक्शन मोडवर आले आहे. या दिवशी बालविवाह झाल्यास थेट कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी दिल्या आहेत.
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यात ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१२ बालविवाह रोखले
मागील सव्वा तीन वर्षांत जिल्ह्यात प्रशासनाला १२ बालविवाह थांबविण्यात यश आले. सन २०२२मध्ये २, २०२३ ३, २०२४ मध्ये २, तर २०२५ मध्ये ५ बालविवाह थांबविण्यात आले. यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६मधील कलम १६ (१) नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी दिली.
पंडित, छायाचित्रकारांवर होणार कारवाई
बालविवाहात सहभागी होणारे व सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, धार्मिक गुरू, पंडित, सेवा देणारे व्यावसायिक, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन मालक यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
शुभ मुहूर्ताचा गैरफायदा
अक्षय्यतृतीयेचा संपूर्ण दिवस साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मानला जातो. या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
बालविवाह रोखण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १०९८ अथवा ११२ यावर माहिती नोंदविता येणार आहे.