मिर्ज़्या नाही ‘हर्ष’दायक

By Admin | Updated: October 8, 2016 01:25 IST2016-10-08T01:25:40+5:302016-10-08T01:25:40+5:30

मध्यांतरापर्यंत मिर्ज़्या चांगला चित्रपट आहे की नाही यांचा अंदाज बांधणे कठीण जाते.

Mirza is not 'Happy' | मिर्ज़्या नाही ‘हर्ष’दायक

मिर्ज़्या नाही ‘हर्ष’दायक


- जान्हवी सामंत
मध्यांतरापर्यंत मिर्ज़्या चांगला चित्रपट आहे की नाही यांचा अंदाज बांधणे कठीण जाते. ‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांबरोबरच ‘अक्स’ आणि ‘दिल्ली ६’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याकडून रोमान्स आणि संगीताच्या जादूबाबत नेमकी काय अपेक्षा करावी हे कळत नाही. एक मात्र नक्की मिर्ज़्यासारखे भव्य चित्र रंगविण्याकरता दिग्दर्शकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे हे यातून कळून येते. मात्र इतक्या कष्टांनंतरही कथा प्रेक्षकांना बांधून ठेवू शकत नाही.
मिर्ज़्या ही कथा राजस्थानामधील मिर्ज़ा आणि साहिबा या प्रसिद्ध दंतकथेवर आधारित आहे. मिर्ज़ा आणि साहिबाला त्या काळातील रोमियो-ज्युलिएट म्हणू शकतो. या दोन प्रेमींचे कुटुंबीय त्यांच्या प्रेमाच्या विरोधात असते आणि त्यांना वेगळे करण्याचे खूप प्रयत्न केले जातात. मात्र मिर्ज़ा आणि साहिबा एकमेकांच्या मिठीतच शेवटचा श्वास घेतात. ‘रंग दे बसंती’प्रमाणेच दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या जुन्या कथेला एका आधुनिक कथानकाबरोबर जोडून त्याला नव्या रूपात सादर केले आहे. नव्या कथेमध्ये मिर्ज़ा आणि साहिबा हे मुनिष आणि सुचित्राच्या रूपात तुम्हाला दिसतात. हे दोघे बालपणीचे मित्र-मैत्रीण असतात. जोधपूरच्या एकाच शाळेत त्यांचे शिक्षण होते. एकदा मुनिषने केलेल्या चुकीची शिक्षा शिक्षक सुचित्राला देतात. मुनिषला या गोष्टीची एवढी चीड येते की, तो बंदूक घेऊन त्या शिक्षकाला ठार करतो. या घटनेनंतर मुनिषची रवानगी बालसुधारगृहात होते, तर त्याचदरम्यान सुचित्राचे वडील तिला घेऊन शहर सोडून निघून जातात. यानंतर सुचित्राचा विवाह राजस्थानातील एका राजकुमारासोबत ठरतो. तर दुसरीकडे मुनिष बालसुधारगृहातून आल्यानंतर शाही महालात असणाऱ्या घोड्यांच्या तबेल्यात आदिल या नावाने काम करू लागतो. प्रिन्स करण मुनिषला त्याच्या होणाऱ्या बायकोला घोडेस्वारी शिकविण्यास सांगतो. आदिलबरोबर काही काळ घालविल्यानंतर तो तिचा बालपणीचा मित्र मुनिष असल्याचे सुचित्राच्या लक्षात येते. मुनिष आणि सुचित्रा एकमेकांच्या सहवासात आल्यानंतर त्यांना जाणवू लागते की, त्यांचे भविष्य हे एकमेकांबरोबर बांधले गेले आहे. सुचित्राच्या लग्नाच्या दिवशी मुनिष तिला घेऊन पळून जातो आणि राजघराण्याचा रोष ओढावून घेतो. इतर प्रेमकथांप्रमाणेच या प्रेमकथेचा शेवटही दुर्दैवी आहे. पण एकंदरीत सिनेमाची नाट्यमय कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरते. जुन्या आणि नव्या कथेची सांगड दिग्दर्शकाला नीट घालता आलेली नाही. जुनी कथा फक्त पार्श्वगायनाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. हा ट्रॅक खूपच स्टायलिश चित्रीकरणातून सादर करण्यात आला आहे. या दृश्यांमध्ये गेम आॅफ थ्रोन्सचा प्रभाव दिसून येतो. पण संवादाच्या अभावामुळे सादरीकरणामध्ये तोचतोचपणा जाणवतो. राजस्थानी लोकनृत्य कलाकारांचा ट्रॅकही रटाळ वाटतो. त्या मानाने सिनेमामधील आधुनिक ट्रॅक अधिक रंजक आहे.
कथेतील व्यक्तिचित्रणे, आदिल आणि सुचित्राच्या आयुष्यातील आणि जगण्यातील तफावत, दोन्ही प्रेमीयुगुलांची निरागसता आणि एकमेकांसाठीची तीव्रता या सगळ्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. पण या सगळ्याचा चित्रपटाला काही फायदा होत नाही आहे. चित्रपटात सतत येणारी गाणी, दलेर मेहंदीचा अतिउत्साही आवाज आणि कंटाळवाणे राजस्थानी लोकनृत्य या सगळ्यामुळे चित्रपट आपल्या मूळ कथेपासून भरकटत जातो. नक्की मिर्ज़ा आणि साहिब एकमेकांवर जीव तोडून का प्रेम करतात हे चित्रपटाच्या दोन्ही कथानकांमधून कळत नाही.
गुलजार यांच्या गाण्यांनी या सिनेमाचा मूड सेट व्हायला मदत होते. मात्र एवढे असूनही चित्रपटाला वेग मिळत नाही. ओम पुरीसारख्या ज्येष्ठ कलाकाराला दोन सीन इतकेही काम नाही. हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर यांना अभिनयाला वाव नसला तरीही दोघेही कॅमेरासमोर अतिशय आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. स्क्रीन प्रेझेन्स दोघांमध्येही आहे. पण त्यांचे संवाद आणि सीन्स खूप आॅक्वर्ड आहेत. ‘सैराट’सारख्या सिनेमाच्या जमान्यात प्रेक्षकांना हाय वोल्टेज ड्रामा, इन्टेन्स केमिस्ट्री बघायला आवडते. त्यामानाने मिर्ज़्या हा फार आऊटडेटेड चित्रपट वाटतो. अवघड आणि बोजड कथानकामुळे मिर्ज़्याला स्वत:चे वजन पेलवत नाही. गुलजार यांचे संवाद, राकेश ओमप्रकाश मेहराने घेतलेले कष्ट, चित्रपटावर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च हे सगळे निरर्थक ठरते.
।जुनी कथा फक्त पार्श्वगायनाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. हा ट्रॅक खूपच स्टायलिश चित्रीकरणातून सादर करण्यात आला आहे. या दृश्यांमध्ये गेम आॅफ थ्रोन्सचा प्रभाव दिसून येतो. पण संवादाच्या अभावामुळे सादरीकरणामध्ये तोचतोचपणा जाणवतो. राजस्थानी लोकनृत्य कलाकारांचा ट्रॅकही रटाळ वाटतो. त्या मानाने सिनेमामधील आधुनिक ट्रॅक अधिक रंजक आहे.

Web Title: Mirza is not 'Happy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.